मुलासाठी कर्ज काढून 20 लाख भरले अन् त्याच कॉलेजने….; वडिलांचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

पुण्यातील तोलानी मेरिटाइम इन्स्टिट्यूटमध्ये बास्केटबॉलचा लोखंडी खांब कोसळून अयोध्या येथील विद्यार्थी विशाल वर्मा याचा दुर्दैवी मृत्यू झाला. महाविद्यालयाच्या निष्काळजीपणा आणि सुरक्षा अभावामुळे ही घटना घडल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे.

मुलासाठी कर्ज काढून 20 लाख भरले अन् त्याच कॉलेजने....; वडिलांचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
Tolani Maritime Institute Vishal Verma
| Updated on: Apr 07, 2026 | 1:17 PM

पुण्यातील तळेगाव दाभाडे या ठिकाणी असलेल्या एका नामांकित तोलानी मेरिटाइम इन्स्टिट्यूट (TMI) मध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर बास्केटबॉल खेळत असताना लोखंडी खांब अंगावर कोसळून विशाल वर्मा या २० वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना केवळ अपघात नसून हत्या असल्याचा दावा विशाल वर्माच्या कुटुंबियांनी केला आहे. तोलानी इन्सिट्यूटच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे आमच्या मुलाचा मृत्यू झाला, असा आरोप मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबियांनी केला आहे.

नेमकी घटना काय?

मूळचा अयोध्येचा रहिवासी असलेला विशाल वर्मा हा या संस्थेत मरिन इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. तो एक हुशार विद्यार्थी होता. त्यासोबतच तो पदकाविजेता खेळाडूही होता. रविवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे विशाल मैदानावर सराव करण्यासाठी गेला. खेळत असताना अचानक बास्केटबॉल बोर्डचा जड लोखंडी खांब मुळापासून उखडून थेट विशालच्या डोक्यावर कोसळला. या भीषण अपघातामुळे विशाल गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला.

शैक्षणिक वर्तुळात तीव्र संताप

प्रत्यक्षदर्शी आणि सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातानंतर विशाल तब्बल ४० मिनिटे शुद्धीवर होता. तो मदतीसाठी सतत याचना करत होता. मात्र जागतिक दर्जाची सुविधा देण्याचा दावा करणाऱ्या या संस्थेकडे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी साधी रुग्णवाहिका तसेच त्यासाठी चालक नव्हता. त्याला वेळेवर उपचार मिळाले नाहीत, त्यामुळे विशाल वर्मा या तरुण विद्यार्थ्याला आपले प्राण गमवावे लागले. सध्या या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या घटनेनंतर विशालच्या कुटुंबियांनी महाविद्यालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या १५ वर्षांपासून इथे असलेल्या या क्रीडा साहित्याची साधी रंगरंगोटी करण्यात आलेली नाही. तसेच त्याचा मेटेंन्सही करण्यात आला नव्हता, असा दावा त्यांनी केला आहे. या ठिकाणी असलेल्या लोखंडी खांबांना मोठ्या प्रमाणात गंज लागलेला होता. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत होते. दरवर्षी ही संस्था लाखो रुपये शुल्क आकारते. मात्र या संस्थेकडे आपत्कालीन परिस्थितीसाठी चालक नसणे, ही बाब या ठिकाणी असलेल्या प्राचार्यांनीच कबूल केली आहे, असेही त्याच्या कुटुंबियांनी म्हटले.

विशालचे वडील भावूक

यावेळी प्रतिक्रिया देताना विशालचे वडील बाबूराम वर्मा यांनी अत्यंत भावूक झाले. मी शेती करून, पोटाला चिमटा काढून आणि कर्जबाजारी होऊन दोन वर्षांत २० लाख रुपये फी भरली होती. ज्या महाविद्यालयात मी माझ्या मुलाला भविष्य घडवण्यासाठी अयोध्येहून पुण्यात पाठवले, तेच त्याच्यासाठी कर्दनकाळ ठरले,” अशा शब्दांत विशालने आपला आक्रोश व्यक्त केला. विशालच्या मृत्यूमुळे त्याची केवळ स्वतःची नव्हे तर आमच्या संपूर्ण कुटुंबाची स्वप्ने धुळीस मिळाली आहेत, असेही त्याचे वडील म्हणाले.

विशालची बहीण सुनीता वर्मा यांनी प्रशासकीय दिरंगाईवर बोट ठेवले आहे. महानगरातील एका प्रतिष्ठित संस्थेत वेळेवर रुग्णवाहिका न मिळणे ही लाजिरवाणी गोष्ट असल्याचे त्यांनी म्हटले. विशालच्या भावाने याप्रकरणी पोलिसांत लेखी तक्रार दिली आहे. मात्र घटनेला इतका वेळ उलटूनही अद्याप एफआयआर (FIR) नोंदवण्यात आलेला नाही, असा आरोप कुटुंबाने केला आहे. महाविद्यालय प्रशासनाने भरलेली फी परत करावी आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई होणार का?

या घटनेने पुण्यातील शैक्षणिक संस्थांच्या सुरक्षा ऑडिटबाबत (Safety Audit) मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. जिममधील उपकरणे, प्रयोगशाळेतील यंत्रे आणि क्रीडांगणावरील साहित्य यांची तपासणी केवळ कागदोपत्रीच होते का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. विशालच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us