Raj Thackeray : अरे तू कोणय? वल्लभभाई पटेल की महात्मा गांधी? संभाजीनगरवरून राजच्या निशाण्यावर उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरेंनी सांगावं तुमच्या अंगावर आंदोलन केल्याची एक तरी केस आहे का हो. मग ती मराठीच्या प्रश्नावर असेल किंवा हिंदुत्वाच्या प्रश्नावर असेल. एक तरी केस आहे का. भूमिकाच कुठची घ्यायची नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली.

Raj Thackeray : अरे तू कोणय? वल्लभभाई पटेल की महात्मा गांधी? संभाजीनगरवरून राजच्या निशाण्यावर उद्धव ठाकरे
राज ठाकरे/उद्धव ठाकरे
Image Credit source: tv9
Pradeep Garad | Updated on: May 22, 2022 | 12:53 PM

पुणे : संभाजीनगरचं नामांतर झालं काय नाही झालं काय मी बोलतोय ना. अरे तू कोण आहेस. तू कोण वल्लभभाई पटेल काय महात्मा गांधी. मी बोलतोय ना. त्याला काय लॉजिक आहे, अशी टीका राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. ते पुण्यात बोलत होते. औरंगाबादचे (Aurangabad) नामांतर संभाजीनगर आणि शिवसेनेची भूमिका यावर राज ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, की इतके वर्ष सत्ता होती. कधी प्रश्न मिटवला. केवळ निवडणुकीसाठी जिवंत ठेवायचं आणि मते मिळवायची. याच गोष्टी यांना करायच्या आहेत. उद्या नामांतर झालं तर बोलायचं कशावर. प्रश्नच मिटला ना, असा घणाघात त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेनेवर केला आहे.

उद्धव ठाकरेंवर टीका करताना काय म्हणाले राज ठाकरे?

‘आम्ही रिझल्ट देतो’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती. त्यावर राज ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले, की त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची सभा झाली. काय सालं पोरकटपणा आहे कळत नाही. तुमचं खरं हिंदूत्व की आमचं खरं हिंदुत्व. काय वाशिंग पावडर आहे. तुम्हारी कमीजसे हमारी कमीज व्हाइट कैसी. लोकांना हिंदुत्वाचा रिझल्ट पाहिजे. जे आम्ही देतो. महाराष्ट्रातील मराठी माणसाला आम्ही रिझल्ट देतो, असे ते म्हणाले.

ममता बॅनर्जींचे कौतुक

रेल्वे भरतीवरून त्यांनी टीका केली. ते म्हणाले, की रेल्वे भरती महाराष्ट्रात होती. तिकडून हजारो लोकं रेल्वे स्टेशनवर आली. मी फोटो पाहिला. ते काय आहे. पदाधिकाऱ्यांना सांगा. भेटा बोला. बोलायला गेले होते. कुठून आले काय आले. बोलता बोलता त्या बाचाबाचीत आपल्या पदाधिकाऱ्याला आईवरून शिवी दिली. त्यानंतर जे प्रकरण सुरू झालं ते तिथून. प्रकरण सोडा. महाराष्ट्रातील रेल्वे भरती महाराष्ट्रातील लोकांना माहीत नाही. पेपरला जाहिराती नाही. पण यूपी बिहारमध्ये जाहीराती होत्या. त्यावर बोलायचं नाही. उद्या उत्तर प्रदेश बिहारमध्ये भरती असेल तर त्यांना नोकरी मिळाली पाहिजे. ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री होत्या. त्यांनी स्थानिक भाषेत परीक्षा घ्यायचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातील हजारो मुलांना नोकरी मिळाली. हे त्या आंदोलनाचं यश आहे, असे ते म्हणाले.

‘एक तरी केस आहे का तुमच्या अंगावर?’

आंदोलन अर्धवट सोडणारे म्हणणाऱ्यांवरही टीका करत ते म्हणाले, की हे जे टिमक्या मिरवतात ना, राज ठाकरे अर्धवट सोडवतो. एक आंदोलन दाखवा अर्धवट सोडतो. टोलनाक्याचं आंदोलन घेतलं. 70 टोलनाके बंद झाले. म्हणजे यांची काहीच जबाबदारी नाही. बाकीच्या पक्षाची जबाबदारी नाही. टोलवाले लुटतात. त्याचं काहीच नाही. बॉलिवूडमध्ये पाक कलाकार येत होते. त्यांना देशातून हाकलून दिलं. कुठे होते त्यावेळी हिंदुत्वाची पकपक करणारे, अशी टीका त्यांनी केली. रझा अकादमीने पोलीस महिलांवर हात टाकला. त्याविरोधात मनसेने मोर्चा काढला. कोणतं हिंदुत्व बोलता तुम्ही. उद्धव ठाकरेंनी सांगावं तुमच्या अंगावर आंदोलन केल्याची एक तरी केस आहे का हो. मग ती मराठीच्या प्रश्नावर असेल किंवा हिंदुत्वाच्या प्रश्नावर असेल. एक तरी केस आहे का. भूमिकाच कुठची घ्यायची नाही. 92-93ला दंगल झाली त्यावरच बोलायचं, अशी टीका त्यांनी केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us