Thalapathy Vijay: सॉरी.. मंत्र्याकडून चूक होताच विधानसभेत थलपती विजय यांनी मागितली माफी; नेमकं काय घडलं?
Thalapathy Vijay: तमिळनाडूच्या विधानसभेत मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी माफी मागितली. त्यांच्या या कृतीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. विधानसभेत नेमकं काय घडलं होतं, ते जाणून घ्या..

तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी सोमवारी विधानसभेत माफी मागितली. विधानसभेतील एका वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर विजय यांनी स्वत: हस्तक्षेप करत सभागृहात माफी मागितली. विशेष म्हणजे, ही माफी त्यांनी त्यांच्या वनमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल मागितली आहे. यामुळे थलपती विजय यांच्या संयमी भूमिकेचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. राजकारणात मतभेद असले तरी सभागृहातील शिष्टाचार आणि दिवंगत नेत्यांचा सन्मान राखण्याची भूमिका विजय यांनी घेतली, असं म्हणत समर्थकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.
नेमकं काय घडलं?
सोमवारी तमिळनाडू विधानसभेत विविध विभागांच्या अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा सुरू होती. यावेळी वनमंत्री आर. व्ही. रंजीत कुमार हे त्यांच्या भाषणात निवडणुकीतील कथिक ‘कॅश फॉर व्होट’च्या राजकारणाचा संदर्भ देत होते. याच चर्चेदरम्यान त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत डीएमके नेते एम. करुणानिधी यांचा उल्लेख केला. मात्र त्यांच्या नावासोबत नेहमी वापरला जाणारा सन्मानसूचक उल्लेख न केल्याने डीएमकेच्या आमदारांनी आक्षेप घेतला.
मुख्यमंत्र्यांनी स्वत: मागितली माफी
करुणानिधी हे तमिळनाडूच्या राजकारणातील अत्यंत प्रभावशाली नेते मानले जातात. त्यामुळे त्यांच्या नावाचा सभागृहात उल्लेख करताना प्रचलित सन्मानसूचक शब्द वापरण्याची परंपरा असल्याचा दावा डीएमके सदस्यांनी केला. याच मुद्द्यावरून सभागृहात काही काळ वातावरण तापलं होतं. हा वाद वाढत असल्याचं लक्षात येताच मुख्यमंत्री विजय यांनी तातडीने हस्तक्षेप केला. त्यांनी मंत्र्यांचं भाषण थांबवत संबंधित उल्लेख योग्य पद्धतीने झाला नसल्याचं मान्य केलं. त्यानंतर “मी त्यांच्या वतीने माफी मागतो” असं म्हणत विजय यांनी सभागृहात माफी मागितली. मुख्यमंत्र्यांनी स्वत: माफी मागिल्याने सभागृहातील तणाव कमी झाला आणि पुढील कामकाज पुन्हा सुरळीत सुरू झालं.
थलपती विजय यांच्या या कृतीची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. अभिनेता म्हणून प्रचंड लोकप्रियता मिळवल्यानंतर राजकारणात प्रवेश केलेल्या विजय यांच्यासाठी मुख्यमंत्री म्हणून हा कार्यकाळातील महत्त्वाचा राजकीय प्रसंग मानला जात आहे. सभागृहात निर्माण झालेला वाद त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन शांत केला, यामुळे त्यांच्या राजकीय कामकाजाच्या शैलीचीही चर्चा होत आहे.
