Raj Thackeray : एक खासदार उठतो अन् मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो, राज ठाकरेंना भाजपावरच संशय?

मी हट्टाने गेलो असतो. महाराष्ट्रातील सैनिक हिंदू बांधव आले असते. तिथे जर काही झालं असतं. आपली पोरं तर गेली असती अंगावर. तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या. तुम्हाला तुरुंगात सडवलं गेलं असतं, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.

Raj Thackeray : एक खासदार उठतो अन् मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो, राज ठाकरेंना भाजपावरच संशय?
ब्रिजभूषण सिंग यांच्यावर आरोप करताना राज ठाकरे
Image Credit source: tv9
| Updated on: May 22, 2022 | 11:59 AM

पुणे : शिव्या खाईल. माझ्यावरील टीका सहन करेल. पण पोरं नाही अडकवू देणार. आता जाग आली. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी माफी मागावी. 12 वर्षानंतर जाग आली. तेव्हा कुठे होती ही माणसं, असा सवाल राज ठाकरे यांनी करत भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंग (Brijbhushan Singh) यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, की एक सांगतो. यातून चुकीचे पायंडे पडतात हे लक्षात ठेवा. विषय माफी मागण्याचा आहे ना. गुजरातला अल्पेश ठाकोर आहे. एका मुलीवर बलात्कार झाला. उत्तर प्रदेश बिहारच्या लोकांना मारलं. 10 ते 15 हजार लोकांना गुजरातमधून हाकलून दिले. ते मुंबईत आले. ते पुन्हा गुजरातला गेले. तिथून कोण माफी मागणार आहे. तिथून कुणाला माफी मागायला लावणार. तुम्हीहही राजकारण (Politics) समजून घ्या. हे आता कसं काय सुरू झालं अचानक. ज्यांना हिंदूत्व झोंबलं लाऊडस्पीकर झोंबले. आपल्या विरोधात सर्व एकत्र येतात, असा आरोप त्यांनी केला.

‘हा एक ट्रॅप’

अयोध्या दौरा रद्द काही लोकांना वाईट वाटलं काहींना आनंद झाला. काही लोक कुत्सित बोलत होते. त्यामुळे दोन दिवसांचा मुद्दाम बफर दिला. काय बोलयाचं ते बोला. मग मी माझी भूमिका महाराष्ट्र आणि देशाला सांगेल. ज्या दिवशी लाऊडस्पीकर बंदची घोषणा केली. त्यानंतर पुण्यात मी अयोध्येला जाणार याची तारीख जाहीर केली. त्यानंतर हे प्रकरण सुरू झालं. अयोध्येला येऊ देणार नाही. मी पाहत होतो. काय चाललं नेमकं. मला मुंबईतून माहीत मिळत होती. दिल्लीतून माहिती मिळत होती. उत्तर प्रदेशातून माहिती मिळत होती. नेमकं काय चाललंय. एक वेळ चाललं की हा ट्रॅप आहे, असे ते म्हणाले.

‘यात अडकू नका’

या सापळ्यात आपण आडकलं नाही पाहिजेत. या सर्व गोष्टीची सुरुवात झाली. त्याची रसद पुरवली गेली. त्याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली, हा विषय पुन्हा बाहेर काढा. ज्यांना ज्यांना माझी अयोध्या वारी खुपली होती असे अनेक जण होते. त्या सर्वांनी मिळून आराखडा आखला. मी एकाच गोष्टीचा विचार केला. अयोध्येला जाणार हा विचार मनात होतो. राम जन्मभूमीचं दर्शन घेणं आलं. पण मला वाटतं तुम्ही जन्मालाही आला नसतील. तुमच्या पैकी. तेव्हा चॅनेल्स नव्हती. तेव्हा दुरदर्शन होतं. त्यावेळचे पत्रकार होते. त्यावेळी न्यूज रिल्स चालवायचे अर्ध्या तासाचे. मला आठवतं. तेव्हा मुलायमसिंह मुख्यमंत्री होते. तेव्हा कारसेवक अयोध्येला गेले होते. त्यांना ठार मारलं होते. त्यांची प्रेतं शरयू नदीत तरंगताना पाहिली होती. दर्शन घ्यायचं होतंच. कारसेवक जिथे मारले गेले. ती जागा अयोध्येत आहे. त्याचं दर्शन घ्यायचं होतं. राजकारणात अनेकांना भावना समजून घेत नाहीत, असे ते म्हणाले.

‘आपली पोरं गेली असती’

मी हट्टाने गेलो असतो. महाराष्ट्रातील सैनिक हिंदू बांधव आले असते. तिथे जर काही झालं असतं. आपली पोरं तर गेली असती अंगावर. तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या. तुम्हाला तुरुंगात सडवलं गेलं असतं. हकनाक कारण नसताना केसेसचा ससेमिरा लावला असता. मी बाळा नांदगावकर आणि सरदेसाईंना सांगितलं आपल्या पोरांना हकनाक घालवणार नाही. सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांवर केसेस टाकल्या असत्या. ऐन निवडणुकीच्यावेळी हे झालं असंत. तेव्हा इथे कोणीच नसतं हा सर्व ट्रॅप होता. एक खासदार उठतो आणि मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो. शक्य आहे का. या गोष्टींना अनेक पापुद्रे आहेत. काही तर तुम्हाला सांगता येणार नाही, अशी टीका त्यांनी केली.