
Raj Thackeray on Gautam Adani: मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. आज प्रचाराचा धुराळा खाली बसत असतानाच राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. पुण्यात अगदी थोडक्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप कुणाला मोठं करतंय आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात. तर यापूर्वी त्यांनी केलेल्या टीकेचा रोख काय आणि कुणावर होता हे एका लाईनमध्ये अधोरेखित केले. त्यांनी भविष्यात एकाधिकारशाहीचा काय फटका बसू शकतो यावर मोठे भाष्य केले. अर्थातच त्यांच्या टार्गेटवर भाजप आणि गौतम अदाणी होते, हे आपसूकच आले. काल-परवा झालेल्या सभांमधून गेल्या 10 वर्षांत अदानींचे व्यावसायिक साम्राज्य कसं वाढलं यावर त्यांनी भाष्य केले. तर दोन्ही भावांच्या संयुक्त मुलाखतीत अदानींवर रोख होताच. धारावीच नाही तर मुंबई आणि परिसर अदानींच्या घशात घालण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप दोन्ही ठाकरे बंधुंनी केला होता. त्यानंतर भाजपने काल राज ठाकरे आणि गौतम अदाणी यांच्या भेटीचे फोटो प्रसिद्ध केले. त्यानंतर आज पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली.
विमानतळं अदाणींच्या ताब्यात
एक गोष्ट नमूद करायची आहे. टाटा, अंबानी आणि इतर उद्योगपती पाहा यांनी यांचे उद्योग स्वत: उभे केले आहेत. आज विमानतळ ही गोष्ट सोडली तर सात की आठ विमानतळे केंद्राने अदाणीला दिले आहे. नवी मुंबईतील विमानतळ सोडलं तर एकही विमानतळ अदाणीने बांधलं नाही. ही दुसर्यांनी बांधलेली आहेत. केंद्राच्या हातातील आहेत. पोर्ट्समध्ये मुंद्रा पोर्ट्स सोडलं तर जेवढी पोर्ट आहेत ती अदानीने उभी केली नाही. ती दुसर्यांची होती. त्यांना गन पॉइंटवर आणून त्यांनी घेतली आहे, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला.
हा एकच माणूस देशाला वेठीस धरू शकतो
तर सिमेंट उद्योगाचे उदाहरण समोर आणत त्यांनी त्यातील धोका समोर आणण्याचा प्रयत्न केला. सिमेंटच्या व्यवसायात ते कधीही नव्हते. अल्ट्रा टेक आणि अंबुजा सिमेंट विकत घेऊन ते दोन नंबरला गेले आहेत. गेल्या दहा वर्षात दुसऱ्यांचे व्यवसाय खेचून दोन नंबरला गेले. पॉवर आणि स्टिलही तसाच आहे. हा विषय कुणाच्या ग्रोथचा वाढीचा नाही. ती कशी होतेय याचा विषय आहे. उद्या हा एकच माणूस उद्या देशाला वेठीस धरू शकतो. जे इंडिगोने केलं ते होऊ शकतं. इंडिगोने सर्वांना वेठीस धरले. व्यवसाय बंद केल्याने देशाचे हाल झाले. हा धोका सर्वाधिक आहे. तो मुख्यमंत्र्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. समजणं गरजेचं आहे. समजलं असेल पण सांगणार कोणाला, असा खोचक टोला राज ठाकरे यांनी लगावला.