Sambhajiraje Chhatrapati : ‘…तर असा खेळखंडोबा झाला नसता’; शिवसेनेतल्या फाटाफुटीवर संभाजीराजे छत्रपतींनी नेमकं काय म्हटलं?

| Updated on: Jun 22, 2022 | 4:29 PM

मला स्वत:बद्दल काहीही म्हणायचे नाही. पण मला पुरस्कृत करून दिले असते तर असा खेळखंडोबा झाला नसता. जे झाले ते झाले. मला इतिहासात जायचे नाही. पण तुम्हाला आलेली ही संधी आहे. त्याचा चांगल्या कामांसाठी वापर करावा, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

Sambhajiraje Chhatrapati : ...तर असा खेळखंडोबा झाला नसता; शिवसेनेतल्या फाटाफुटीवर संभाजीराजे छत्रपतींनी नेमकं काय म्हटलं?
सरकारकडून अपेक्षा व्यक्त करताना संभाजीराजे छत्रपती
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : ज्या कोणाचे सरकार येईल, त्याने सामान्य माणसांचे प्रश्न सोडवावे, गेल्या पंधरा दिवसांत जे घडले ते बरोबर नाही. मी माझे स्वतःचे काही म्हणत नाही. पण जर मला पुरस्कृत देऊन टाकले असते तर हा खेळखंडोबा घडलाच नसता, असे वक्तव्य संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी केले आहे. ते पुण्यात बोलत होते. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सध्या पुण्यात आहे. तेथे दर्शनाला आल्यानंतर ते बोलत होते. राज्यात सध्या राजकीय भूकंप झाला असून महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas aghadi government) कोसळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिवसेना गटनेता, मुख्य प्रतोदपद यावरून शिवसेनेत वाद निर्माण झाला आहे. 46 आमदार सोबत असल्याचा दावा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे. हे सर्व मागील दोन दिवसांपासून सुरू आहे. या वादावर थेट भाष्य करण्याऐवजी त्यांचा स्वत:चा काय अनुभव आहे, याला अनुसरून संभाजीराजे छत्रपती यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

‘सामान्यांसाठी काम करावे’

संभाजीराजे म्हणाले, ज्या कोणाचे राज्यात सरकार येईल, त्यांनी सामान्य माणसाचे, शेतकऱ्याचे, कष्टकऱ्यांचे, विद्यार्थी-विद्यार्थिनींचे प्रश्न सोडवावे. या पंधरा दिवसांत जे काही घडले ते बरोबर नाही. मला स्वत:बद्दल काहीही म्हणायचे नाही. पण मला पुरस्कृत करून दिले असते तर असा खेळखंडोबा झाला नसता. जे झाले ते झाले. मला इतिहासात जायचे नाही. पण तुम्हाला आलेली ही संधी आहे. त्याचा चांगल्या कामांसाठी वापर करावा. मराठी माणसांसाठी काही तरी करून महाराष्ट्राचे नाव देशभर कसे होईल, याकडे लक्ष द्यावे, असे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘कोणी कुठे जायचे, हा त्याचा वैयक्तिक अधिकार’

शिवसेनेच्या आमदारांनी बंड केले. त्यावर विचारले असता, ते म्हणाले, की मला त्यांच्या राजकारणात पडायचे नाही. हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. कोणत्या आमदाराने कुठे जायचे हा त्याचा वैयक्तिक अधिकार आहे. त्यामुळे सत्ता कोणाचीही असो, त्याचा वापर सामान्यांसाठी करावा. शेतकरी, सामान्यांना केंद्रबिंदू ठेवून सरकार चालवावे, असे ते म्हणाले. दरम्यान, संभाजीराजे यांची नाराजी आजच्या प्रतिक्रियेवरूनही दिसून आली. राज्यसभेचा उमेदवार म्हणून शिवसेनेने आपल्याला पुरस्कृत करायला हवे होते, अशी अपेक्षा त्यांनी आजही बोलून दाखवली. आजचा दिवस त्यामुळे पाहावा लागला नसता, असेही त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवले.

काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?