आमदार कपिल पाटील आणि डॉ. गणेश देवींवर गंभीर आरोप, राजीनाम्याच्या मागणीसह पुण्यात बेमुदत उपोषण

| Updated on: Jun 06, 2021 | 1:01 AM

साने गुरुजींपासून अनेक समाजधुरीणांची समृद्ध परंपरा असलेल्या राष्ट्र सेवा दलात सध्या फूट पडल्याचं समोर आलंय.

आमदार कपिल पाटील आणि डॉ. गणेश देवींवर गंभीर आरोप, राजीनाम्याच्या मागणीसह पुण्यात बेमुदत उपोषण
Follow us on

पुणे : साने गुरुजींपासून अनेक समाजधुरीणांची समृद्ध परंपरा असलेल्या राष्ट्र सेवा दलात (Rashtra Seva Dal) सध्या फूट पडलीय. सेवा दलाच्या अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी संघटनेचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी आणि कार्यकारी विश्वस्त आमदार कपिल पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आमदार पाटील यांनी संघटनेच्या नियमांची पायमल्ली करुन बेकायदेशीरपणे आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संघटनेच्या पदावर बसवलं आणि संघटनेवर कब्जा केला, असा आरोप आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी केलाय. तसेच सेवा दलाच्या अनेक प्रकल्पांचं, मालमत्तांचं हस्तांतरण वा स्थलांतरण सुरू असून अनावश्यकपणे मोठा खर्च केला जात आहे. अनेक गोष्टींमध्ये गैरव्यवहार होत आहे, असा आरोप झालाय. त्यामुळे आमदार कपिल पाटील आणि डॉ. गणेश देवी यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुणे येथील साने गुरुजी स्मारक येथे 4 सेवा दल कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे (Serious allegations on Dr Ganesh Devy and MLA Kapil Patil by Rashtra Seva Dal workers in Pune).

“कपिल पाटील आणि डॉ. गणेश देवींकडून राष्ट्र सेवा दलाची घटना पायदळी तुडवत कारभार”

पोलिसांनी साने गुरुजी स्मारकात जाण्यापासून रोखल्यानं कार्यकर्त्यांनी गेटच्या बाहेरच आंदोलन सुरु केलं.

उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते मिहीर थत्ते म्हणाले, “आमदार कपिल पाटील आणि डॉ. गणेश देवी यांनी राष्ट्र सेवा दलाची घटना पायदळी तुडवत मागील दीड वर्षांपासून कारभार सुरु केलाय. सेवा दलाच्या घटनेत स्पष्ट तरतुद आहे की कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रतिनिधी, पदाधिकारी असेल त्याला राष्ट्र सेवा दलाचं कोणतंही पद घेण्याची परवानगी नाही. मात्र, कपिल पाटील लोकभारती या राजकीय पक्षाचे प्रमुख असताना ते संघटनेच्या कार्यकारी विश्वस्तपदी आहेत. इतकंच नाही तर सेवा दलाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला कुठल्याही राजकीय पक्षात जाऊन पद घेण्याची मुभा नाही.”

“गणेश देवींनी कपिल पाटलांच्या मदतीने मनमानी पद्धतीने कारभार केला”

“राष्ट्र सेवा दल अखिल भारतीय पातळीवर नेता येईल हा विचार करुन डॉ. गणेश देवी यांना संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आणलं गेलं. ते जागतिक किर्तीचे व्यक्ती आहेत, विचारवंत आहेत. गणेश देवी सर्वांना सोबत घेऊन काम करतील असं वाटलं होतं. मात्र, त्यांनी आल्यानंतर कपिल पाटलांच्या मदतीने मनमानी पद्धतीने कारभार सुरू केला. यालाच सेवा दल कार्यकर्त्यांचा विरोध आहे. याबाबत अंतर्गत पातळीवर अनेकदा चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र कपिल पाटील आणि गणेस देवी यांनी चर्चेला तयारी दाखवली नाही. त्यामुळे अखेर आम्हाला हा उपोषणाचा संवैधानिक मार्ग निवडावा लागला”, अशी माहिती उपोषणाला बसलेले सेवा दलाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते विलास किरोते यांनी दिली.

राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी आमदार कपिल पाटील आणि डॉ. गणेश देवी यांच्या राजीनाम्याची मागणी करत आपल्या घरात राहूनही आंदोलन केलं.

“सेवा दल स्थापना दिनी संघटनेच्या प्रांगणात येण्यास अडकाव, दडपशाही करण्यासाठी पोलिसांना बोलावलं”

आमदार कपिल पाटील आणि डॉ. गणेश देवी यांच्या राजीनाम्याची मागणी करत पुण्यातील साने गुरुजी स्मारकात सुरु असलेलं आंदोलन.

दरम्यान, आंदोलकर्त्यांनी कपिल पाटील यांच्यावर पोलिसांचा वापर करुन उपोषणकर्त्या कार्यकर्त्यांना दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केलाय. सकाळपासून कपिला पाटील यांनी आपल्या पदाचा वापर करत साने गुरूजी स्मारकात मोठा पोलीस बंदोबस्त लावला. तसेच सुरुवातील स्मारकातही प्रवेश करु देण्यास अडकाव केला. मात्र, नंतर कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर प्रवेश देण्यात आला, असा आरोप उपोषणकर्त्या कार्यकर्त्यांनी केलाय. “सेवा दलात ही जी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालीय. त्यावर मार्ग काढण्यासाठी संवाद बैठकीची आवश्यकता आहे. अशा विनाअट बैठकीसाठी दोन्ही गटांनी तयार रहावं असं आमचं आवाहन आहे,” अशी भूमिका प्रविण वाणी यांनी मांडली.

उपोषणकर्त्यांच्या मागण्या काय?

1. लोकभारती पक्षाचे अध्यक्ष, राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त आणि आमदार कपिल पाटील यांच्यावर राष्ट्र सेवा दलाचे संविधान गुंडाळून ट्रस्ट व संघटना यावर कब्जा मिळवल्याचा आरोप करण्यात आलाय. तसेच त्यांच्या विनाविलंब राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

2. राष्ट्र सेवा दल राष्ट्रीय अध्यक्षांनी सन 2019-22 कालावधीसाठी नियुक्त केलेली असंविधानिक राष्ट्रीय कार्यकारिणी त्वरीत बरखास्त करावी.
या असंविधानिक राष्ट्रीय कार्यकारिणीने आज अखेर घेतलेले सर्व निर्णय रद्द ठरविण्यात यावेत. तसेच राष्ट्र सेवा दल संविधान धारा 10.8.1 ते 10.8.5 अनुसार नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची सेवादल मंडळ बैठकीत निवड केली जावी.

3. वारे समितीचा हवाला देवून पदावरून काढून टाकण्यात आलेल्या सर्व पूर्णवेळ कार्यकर्ते यांना पुन्हा संघटनेच्या कामात सन्मानाने सहभागी करून घेण्यात यावे.

4. सेवादलात 3 वर्षे आधीपासून सक्रिय नसलेले, म्हणजेच क्रियाशील सदस्य नसलेल्या ज्या ज्या व्यक्ती जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवर पदांवर आहेत त्यांनी स्वतःहूनच सेवादल संविधानाचा आदर करत आपआपली पदे सोडावीत. त्या सर्वांनी आधी 3 वर्षे सेवादलात सक्रिय सहभाग घ्यावा.

5. संविधानात उल्लेखलेल्या तरतूदींना बगल देत करण्यात आलेली नवीन जिल्हे निर्मिती रद्द करण्यात यावी. अशा नवीन केंद्रात अस्थायी समिती स्थापन करावी. जी फक्त त्या केंद्राच्या कामाचे निर्णय घेऊ शकेल.

6. संघटनेतील आर्थिक उधळपट्टी त्वरीत थांबवावी आणि आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणावी.

7. राष्ट्र सेवा दलाच्या राजकीय भुमिकेबाबत सेवादल मंडळात व्यापक चर्चा घडवून आणून यापुढील काळात कोणालाही राष्ट्र सेवा दल संघटनेचा राजकीय वापर करून घेताच येऊ नये. यासाठी राष्ट्र सेवादल संविधानात आवश्यक ती सुस्पष्टता आणावी. राजकीय पक्षाचे पदाधिकारी हे राष्ट्र सेवादलाचे पदाधिकारी व विश्वस्त होऊच शकणार नाहीत अशी स्पष्ट तरतूद सेवादल संविधानात करण्यात यावी.

8. राष्ट्र सेवा दलाच्या सर्व प्रकल्पांचे, मालमत्तांचे हस्तांतरण वा स्थलांतरण तात्काळ थांबवावे.

9. राष्ट्र सेवा दलासाठी आयुष्य दिलेल्या कार्यकर्त्यांवर, RSS चा असल्याच्या अत्यंत अवमानजनक, बेछूट, खोटा व बदनामीकारक आरोप त्वरीत मागे घेऊन त्यांची जाहीर लेखी माफी मागावी.

“काही असंतुष्ट लोकांचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांवर विनाधार आरोप”

डॉ. गणेश देवी आणि आमदार कपिल पाटील (संग्रहित छायाचित्र)

आपल्यावरील आरोपांबाबत बोलताना राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष गणेश देवी म्हणाले, “आज (4 जून) राष्ट्र सेवा दलाचा 80 वा स्थापना दिन आहे. या दिवशी काही असंतुष्ट लोक एकत्र येऊन अध्यक्ष किंवा पदाधिकारी यांच्यावर विनाधार आरोप करत आहेत. त्यांच्या आरोपांना 1 मे रोजी संघटनेचं मुखपत्र असलेल्या दल पत्रिकेत उत्तरं छापली आहेत. या जून महिन्याच्याही अंकात ही उत्तरं पुन्हा प्रकाशित केली आहेत. ज्यांनी हे आरोप केले आहेत त्यांच्यापैकी काहींवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे, तर काहींवर कारवाई करण्याचं काम सुरु आहे. त्यांचं सदस्यत्व रद्द केलंय. त्या रागापोटी ते आंदोलन करत आहेत.”

“कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांना कळवलं”

आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांना बोलावण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरही गणेश देवींनी स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, “आंदोलकांनी पत्र लिहून आमच्या राजीनाम्यासाठी संघटनेच्या मध्यवर्ती कार्यालयात येणार आहोत असं सांगितलं होतं. तसेच त्यात त्यांनी तेथे कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न झाला तर अध्यक्षांची जबाबदारी असेल असं म्हटलं होतं. त्यामुळे आम्ही याबाबत पोलिसांना कल्पना दिली होती.”

“कपिल पाटील यांना संघटनेचे पदाधिकारी नियुक्तीचे अधिकार नाहीत”

“संघटनेचे 40 ते 50 हजार सदस्य आहेत. त्यातील 20-25 जण असंतुष्ट आहेत. संघटनेचं विश्वस्त मंडळ, राष्ट्रीय कार्यकारणी आणि राज्य कार्यकारणी या तिन्ही फोरममध्ये कोणताही मतभेद नाहीत. हा मुल्यांसाठीच लढा नाही. हे असंतुष्टांचं उपोषण आहे. कपिल पाटील यांना संघटनेचे पदाधिकारी नियुक्तीचे अधिकार नाहीत. त्यांना केवळ विश्वस्त मंडळाबाबतचे अधिकार आहेत. त्यामुळे त्यांनी संघटनेवर चुकीच्या लोकांची नियुक्ती केली या म्हणण्यात तथ्य नाही,” असंही देवी यांनी नमूद केलं.

“आंदोलन मोजक्या 25 लोकांचं नाही तर सेवा दलाच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं”

मात्र, उपोषणकर्त्यांनी त्यांच्या हे आंदोलन मोजक्या 25 लोकांचं नसून राष्ट्र सेवा दलाचे आजी पदाधिकारी, माजी राष्ट्रीय अध्यक्ष, महामंत्री आणि अनेक पूर्णवेळ कार्यकर्ते यांचं असल्याचं सांगितलं. आमदार कपिल पाटील यांनी मात्र या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला. या आंदोलनाची दखल घेण्याची गरज नाही, असं मत व्यक्त करत त्यांनी यावर अधिक बोलणं योग्य नसल्याचं म्हटलं.

पोलिसांनी उपोषणकर्त्यांना ताब्यात घेतलं

शेवटची माहिती आली तोपर्यंत उपोषणाला बसलेल्या राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांना साने गुरुजी स्मारक येथून पोलीस स्टेशनला नेण्यात आलं आहे. या कारवाईचा अनेकांकडून निषेध केला जात आहे.

आमदार कपिल पाटील आणि डॉ. गणेश देवी यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

संबंधित व्हिडीओ पाहा :

हेही वाचा :

‘केवळ प्रचाराने सत्य लपवता येणार नाही, लोकांच्या विचारशक्तीवर माझा विश्वास’, गणेश देवींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

अदानी-अंबानी 21 व्या शतकातील इंग्रज, भाजप त्यांच्याच हातात देश देतोय : डॉ. गणेश देवी

‘घराला तोरण, दारात पणती आणि गोडधोड जेवण’, महाराष्ट्रात ‘सावित्री उत्सवाला’ जोरदार प्रतिसाद

Serious allegations on Dr Ganesh Devy and MLA Kapil Patil by Rashtra Seva Dal workers in Pune