सचिनला माझा ‘हा’ सल्ला, शेतकरी आंदोलानावरुन शरद पवारांनी सचिनचे कान टोचले

| Updated on: Feb 06, 2021 | 7:27 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकरी आंदोलनावर ट्विट करणाऱ्या क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला सल्ला दिलाय.

सचिनला माझा हा सल्ला, शेतकरी आंदोलानावरुन शरद पवारांनी सचिनचे कान टोचले
Follow us on

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकरी आंदोलनावर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. यात त्यांनी मोदी सरकारलाही आंदोलन कसं हाताळावं याविषयी सल्ला दिला. तसेच सचिन तेंडुलकरने घेतलेल्या भूमिकेवरही शरद पवारांनी भाष्य केलं. मोदी सरकारमधील वरिष्ठ नेत्यांनी शेतकरी आंदोलनात लक्ष घालण्याचा सल्ला पवारांनी दिलाय. तसेच सचिनने वेगळ्या क्षेत्राबद्दल बोलायचं असेल तर काळजी घेतली पाहिजे, असंही सांगितलं (Sharad Pawar comment on Sachin Tendulkar remark over Farmer Protest).

शरद पवार म्हणाले, “सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनावर काही भूमिका घेतली असली, तरी सामान्य लोकांमध्ये त्याची प्रतिक्रिया उमटली आहे. त्यांनी वेगळ्या क्षेत्राबद्दल बोलायचं असेल तेव्हा काळजी घेतली पाहिजे, हा माझा सचिनला सल्ला आहे.”

“सरकारने शेतकरी आंदोलनामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. सरकारमधील वरिष्ठ लोकांनी यामध्ये लक्ष द्यावं. पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आंदोलकांशी संवाद साधायला पाहिजे,” असंही त्यांनी नमूद केलं.

“आंदोलकांना अडवायला खिळे ठोकले, स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत असं कधीच घडलं नाही”

शरद पवार म्हणाले, “स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत असं कधीच घडलं नाही. आंदोलक रस्त्यावर येऊ नये यासाठी खिळे ठोकू नये. सरकारने ही टोकाची भूमिका घेतली आहे. देशाचा अन्नदाता रस्त्यावर बसलेला असताना त्यांच्याशी सवांद साधायला पाहिजे. या आंदोलनाबद्दल भारतात सहानभूती तर होतीच, आता दुसऱ्या देशांमध्येही ती सहानभूती पाहायला मिळतेय. हे सरकारसाठी फारसं चांगलं नाहीय. आपल्या राज्यकर्त्यांनी शेतकरी आंदोलन गांभीर्याने घेतलं पाहिजे.”

“दिल्लीत कायदा करण्यापेक्षा राज्यांनी याबाबत निर्णय घ्यावा. असा कायदा करताना राज्यांनी यासंदर्भात पुढाकार घ्यावा असं पत्र मी लिहिलं होतं. तेच पत्र भाजप दाखवत आहेत. मात्र, भाजपने हे तिन्ही कायदे चर्चा न करता लोकसभेत गोंधळात मंजूर केले. देशातला अन्नदाता रस्त्यावर बसला आहे. त्याला खलिस्तानी/दहशतवादी म्हणणं असंस्कृतपणाचं लक्षण आहे,” असंही शरद पवारांनी सुनावलं.

“विधानसभा अध्यक्षाची जागा काँग्रेसचीच”

नाना पटोले यांच्या राजीनाम्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, “विधानसभा अध्यक्ष पदाची ही जागा काँग्रेसचीच आहे. ही जागा काँग्रेसची असली तरी बाकीच्या सहकाऱ्यांशी चर्चा करण्याची महाविकासआघाडीत पद्धत आहे. विधानसभा अध्यक्षाबाबत राज्यातल्या लोकांना विचारा. अजित पवारही त्यात आहेत. जेव्हा आमच्याकडे तो विषय येईल तेव्हा आम्ही तिघे बसून चर्चा करू.”

वीज बिल आणि त्याविरोधातील राज्यातील भाजपच्या आंदोलनावर बोलताना शरद पवार यांनी आपण राज्य प्रशासनात लक्ष घालत नसल्याचं म्हटलं. तसेच यासाठी राज्यातले लोकं आहेत, असं म्हटलं.

हेही वाचा :

महात्मा गांधी जयंतीपर्यंत शेतकरी आंदोलन सुरु राहणार, राकेश टिकैत यांची मोठी घोषणा

चायना आणि पाकिस्तानच्या सीमेवर जितका बंदोबस्त नाही इतका शेतकऱ्यांसाठी केलाय : राज ठाकरे

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यात चक्काजाम

व्हिडीओ पाहा :

Sharad Pawar comment on Sachin Tendulkar remark over Farmer Protest