Shivshahir Babasaheb Purandare Passes Away | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचं पुण्यात वृद्धापकाळानं निधन, छत्रपतींचा इतिहास घराघरात पोहोचवणारा शाहीर काळाच्या पडद्याआड

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं पुण्यात निधन झालंय. ते 100 वर्षांचे होते. पुण्यातल्या दिनानाथ रुग्णालयानं बाबासाहेबांच्या निधनाची माहिती अधिकृत केली आहे. आज सकाळी पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. बाबासाहेबांचं निधन वृद्धापकाळानं झाल्याचं रुग्णालयानं म्हटलं आहे.

Shivshahir Babasaheb Purandare Passes Away | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचं पुण्यात वृद्धापकाळानं निधन, छत्रपतींचा इतिहास घराघरात पोहोचवणारा शाहीर काळाच्या पडद्याआड
babasaheb purandare
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Nov 15, 2021 | 8:16 AM

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं पुण्यात निधन झालंय. ते 100 वर्षांचे होते. पुण्यातल्या दीनानाथ रुग्णालयानं बाबासाहेबांच्या निधनाची माहिती अधिकृत केली आहे. आज सकाळी पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. बाबासाहेबांचं निधन वृद्धापकाळानं झाल्याचं रुग्णालयानं म्हटलं आहे.

सकाळी 10 ते 10.30 दरम्यान त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील

गेल्या काही दिवसांपासून बाबासाहेबांवर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना न्यूमोनिया झाल्याचं सांगण्यात आलं. काल त्यांच्या निधनाची अफवा पसरली. त्यानंतर, मात्र आज पहाटे त्यांचं निधन झालं. सकाळी साडे आठ वाजता बाबासाहेबांचं पार्थिव त्यांच्या पर्वती इथल्या निवासस्थानी घेऊन जाण्यात येईल. तर सकाळी 10 ते 10.30 दरम्यान त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील अशी माहितीही डॉक्टरांनी दिलीये.

सार्वजनिक कार्यक्रमांना जाणंही बंद

काही महिन्यांपूर्वी बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाची शंभरी गाठली होती. त्यावेळी झालेल्या दोन ते तीन कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही घरी येऊन पुरंदरे यांना शुभेच्छा दिल्या होत्या. दोन तीन कार्यक्रम वगळता त्यांनी नंतर कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावली नव्हती. दिवाळीनिमित्त होणाऱ्या शस्त्र पूजन कार्यक्रमालाही ते हजर राहिले नव्हते. मागील काही दिवसांपासून त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहणे पूर्णपणे बंद केले होते.

कोण होते बाबासाहेब पुरंदरे?

बळवंत मोरेश्वर पुरंदरे म्हणजेच बाबासाहेब पुरंदरे यांची ओळख शिवशाहीर म्हणून महाराष्ट्राला आहे. जाणता
राजा ह्या महानाट्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास घराघरात पोहोचवण्याचं मोठं काम बाबासाहेबांनी केल्याचं मानलं जातं. हे महानाट्य फक्त महाराष्ट्रातच नाही तर आंध्र प्रदेश, गोव्यासह देशभरात नावाजलं गेलं. त्यांचा जन्म 29 जुलै 1922 सालचा. म्हणजे ते शंभरीत होते. बाबासाहेबांना इतिहासकार म्हणूनही ओळखलं जातं. त्यांनी फक्त शिवरायांचाच इतिहास लिहिला असं नाही तर पेशव्यांच्या इतिहासावरही प्रकाश टाकला.

बाबासाहेब पुरंदरे यांचे राजकीय संबंधही महाराष्ट्राला सर्वश्रुत आहेत. 1970 च्या काळात बाबासाहेबांनी बाळासाहेब ठाकरेंसोबत शिवसेनेच्या वाढीत महत्वाचं योगदान दिल्याचं मानलं जातं. 2015 साली त्यांना महाराष्ट्र भुषण पुरस्कारानं सन्मानीत करण्यात आलं. तसेच 2019 साली देशातला दुसरा मोठा नागरी सन्मान पद्म विभूषण देऊन गौरविण्यात आलं.

बाबासाहेब पुरंदरेंची ग्रंथसंपदा

बाबासाहेब पुरंदरेंनी तरुण वयातच शिवरायांचा इतिहास लिहायला सुरुवात केली. नंतर तेच लिखाण ‘ठिणग्या’ नावानं पुस्तकरुपात प्रकाशित करण्यात आलं. राजा शिव छत्रपती आणि केसरी अशी इतर पुस्तकंही त्यांनी लिहिली. नारायणराव पेशवे यांच्यावरही बाबासाहेबांनी लिखाण केलं. पण बाबासाहेबांचं सर्वात मोठं काम मानलं गेलं ते जानता राजा हे महानाट्य.

ते 1985 मध्ये नाट्यमंचावर आलं. तेव्हापासून 1 हजार पेक्षा जास्त प्रयोग जाणता राजाचे झालेले आहेत. महाराष्ट्राच्या 16 जिल्ह्यांमध्ये जाणता राजाचे शो झाले. तसेच आग्रा, दिल्ली, भोपाळ, अमेरीका इथेही हे महानाट्य सादर केलं गेलं. जवळपास 200 कलाकार हा प्रयोग सादर करायचे. त्यात हत्ती, घोडे, उंट यांचाही समावेश असायचा. त्यामुळे स्टेजवर एका नाटकाचा प्रयोग होतो असं न वाटता प्रत्यक्षात छत्रपतींचा काळ उभा रहात असे. दरवर्षी दिवाळीच्या तोंडावर त्याचे प्रयोग सुरु व्हायचे. त्यांच्या याच कामाची पावती म्हणून 2007 साली त्यांना मध्य प्रदेश सरकारनं कालिदास सन्मान दिला.

संबंधित बातम्या : 

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक; तीन दिवसांपासून उपचार सुरू

Follow Us