Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे इंदिरा गांधींकडून काही शिकतील? पत्रकार संजय आवटे म्हणतात, काही मुर्खांनी इंदिरा गांधींना पक्षातून काढले, पुढे जे घडले तो उद्धवसाठी धडा

| Updated on: Jun 24, 2022 | 11:28 AM

शिवसेना (Shivsena) या पक्षाचे चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावरही आता एकनाथ शिंदे यांनी दावा केला आहे. मात्र हे चिन्ह त्यांना मिळू शकते का, निवडणूक आयोग याविषयी काय निर्णय घेऊ शकते तसेच इतिहासात अशा काही राजकीय घटना घडल्या, ज्याचा परिणाम त्या-त्या पक्षावर झाला, याचा आढावा या पोस्टमधून संजय आवटे यांनी घेतला आहे.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे इंदिरा गांधींकडून काही शिकतील? पत्रकार संजय आवटे म्हणतात, काही मुर्खांनी इंदिरा गांधींना पक्षातून काढले, पुढे जे घडले तो उद्धवसाठी धडा
इंदिरा गांधी/उद्धव ठाकरे/एकनाथ शिंदे
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह मिळू शकते आणि खरी शिवसेना हीच, असेही सिद्ध होऊ शकते. अखेरीस हे सिद्ध करणार कोण? निवडणूक आयोग! त्याविषयी काय बोलावे, असे मत पत्रकार संजय आवटे (Sunjay Awate) यांनी व्यक्त केले आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांना सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले आहे. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी सध्या बंड केले आहे. आता तर आपल्यासोबत 50हून अधिक आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेना (Shivsena) या पक्षाचे चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावरही त्यांनी दावा केला आहे. मात्र हे चिन्ह त्यांना मिळू शकते का, निवडणूक आयोग याविषयी काय निर्णय घेऊ शकते तसेच इतिहासात अशा काही राजकीय घटना घडल्या, ज्याचा परिणाम त्या-त्या पक्षावर झाला, याचा आढावा या पोस्टमधून आवटे यांनी घेतला आहे.

लोकांनी जाहीर केले ‘बाई संपल्या’

पोस्टमध्ये लिहिले आहे, की सध्याच्या उद्भवलेल्या परिस्थिती उद्धव ठाकरे यांनी आदर्श घ्यावा तो इंदिरा गांधींचा. 1969मध्ये काँग्रेसच्या काही मुर्खांनी इंदिरा गांधींनाच पक्षातून बाहेर काढले. पक्षात उभी फूट पडली. बैलजोडी हे चिन्हही इंदिरा गांधींकडून हिरावून घेतले गेले. दूर कशाला, आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधींनी हाताचा पंजा हे चिन्ह निवडले. 1977ची लोकसभा निवडणूक इंदिरा गांधी हरल्या. अगदी स्वतःही पराभूत झाल्या. ‘बाई संपल्या’, असे लोकांनी जाहीर करून टाकले.

फुटीर काँग्रेसला मुख्यमंत्रीपद

गंमत बघा. या काळात महाराष्ट्रात जे घडले, ते आजच्या काळाशी सुसंगत मानावे लागेल. 1977मध्ये लोकसभा निवडणूक झाली. त्यात इंदिरा गांधी पराभूत झाल्या. जनता पक्षाने निवडणूक जिंकली. मोरारजीभाई देसाई पंतप्रधान झाले. त्यानंतर 1978मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाली. ती निवडणूक इंदिरा गांधींची काँग्रेस, यशवंतराव चव्हाण आणि रेड्डी यांची (मूळ) काँग्रेस आणि जनता पक्ष या तिघांनी स्वतंत्रपणे लढवली. जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यांना 99 जागा मिळाल्या. मात्र, त्यांना विरोधात बसवले गेले आणि दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या. इंदिरा काँग्रेसकडे जागा कमी होत्या. त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले. फुटीर काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळाले. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले. नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री झाले.

हे सुद्धा वाचा

पत्रकार संजय आवटे यांची पोस्ट

तेव्हाही होता उपमुख्यमंत्रीपदाबद्दलची नाराजी

इंदिरा गांधींची काँग्रेस तेव्हा राज्यात आणि देशात दुबळी होती. दुसरी काँग्रेस शक्तिमान होती. आणि जनता पक्ष सर्वशक्तिमान होता. राज्यात दोन्ही काँग्रेस सत्तेत आल्या. पण, शरद पवारांनी 41 आमदार सोबत घेतले आणि जनता पक्षासोबत जाऊन सरकार बनवले. तेव्हाही, उपमुख्यमंत्र्यांबद्दलची नाराजी हा एक मुद्दा होता. अगदी कमी आमदार सोबत असूनही शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद मिळवले. मात्र, केंद्रातले सरकार अल्पावधीत पडले. मुदतपूर्व निवडणूक झाली.

…आणि मिळवले प्रचंड यश

1980ची ही निवडणूक इंदिरा गांधींनी लढवली. हाताचा पंजा हे त्यांचे चिन्ह होते आणि इंदिरा गांधींनी त्या निवडणुकीत प्रचंड यश मिळवले. केंद्रात तर त्यांची सत्ता आलीच. पण, राज्य सरकारही बरखास्त झाले. मग, महाराष्ट्रातही इंदिरा काँग्रेसची सत्ता आली. बंडखोर काँग्रेस हीच मूळ काँग्रेस आहे, असे निवडणूक आयोगाने मान्य करूनही; इंदिरा गांधींचे निवडणूक चिन्ह हिरावून घेऊनही इंदिरा गांधी अजिंक्य ठरल्या. उद्धव ठाकरेंनी इतिहासाचा हा दाखला लक्षात घ्यावा, असे संजय आवटे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.