अजित पवार यांच्याशी संबंध कसे? सुप्रिया सुळे यांनी दिलं कुटुंबातीलच ‘या’ नेत्याचं उदाहरण; चर्चांना पूर्णविराम मिळणार?

सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. केंद्रात इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रात शरद पवार यांच्यावर बोलल्याशिवाय आमच्या विरोधकांचा दिवस जात नाही. याला मी कॉम्प्लिमेंट म्हणून घेते, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

अजित पवार यांच्याशी संबंध कसे? सुप्रिया सुळे यांनी दिलं कुटुंबातीलच या नेत्याचं उदाहरण; चर्चांना पूर्णविराम मिळणार?
supriya sule
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 17, 2023 | 1:28 PM

पुणे | 17 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात एका उद्योगपतीच्या घरी भेट झाली. या गुप्तभेटीची बातमी बाहेर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीमधील फूट ही ठरवून आखलेली रणनीती तर नाही ना? अशा चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर, अजित पवार माझा पुतण्या आहे, वडीलधाऱ्यांना भेटला तर बिघडलं कुठं? असा सवाल शरद पवार यांनी केला आहे. तर, तुम्ही नाती जपायची आणि कार्यकर्त्यांनी हाणामारी करायची का? असा सवाल ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. या सर्व घडामोडींवर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर भाष्य करताना कुटुंबातीलच एका नेत्याचं उदाहरण दिलं आहे. आमची काही वैयक्तिक लढाई नाहीये. ही राजकीय लढाई आहे. वैचारिक आहे. विचारांची आहे. एनडी पाटील यांची पत्नी ही शरद पवारांची सख्खी बहीण. एनडी पाटील आमचे मामा. एनडी पाटील आणि शरद पवार वेगवेगळ्या पक्षात होते. दोघांचेही वैचारिक आणि राजकीय मतभेद होते. कुटुंब म्हणून आम्ही एक होतो. आम्ही एकमेकांच्या घरी जायचो. तेव्हा कुणी असा सवाल केला नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळे यांनी घरातीलच उदाहरण दिल्याने अजितदादा-शरद पवार यांच्या भेटीच्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मला बोलण्याची गरज नाही

भेटीवर अजितदादा आणि शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे मलाही वेगळं बोलण्याची गरज नाही. चोरडिया कुटुंबाशी शरद पवार यांचे आमच्या जन्मापासूनचे संबंध आहेत. पवार आणि ईश्वरलाल चोरडिया कॉलेजपासूनचे मित्र आहेत. लोकशाहीत संवाद असलाच पाहिजे. मी संसदेत अनेक भाजप नेत्यांना भेटते. धोरणावर चर्चा होते. मंत्र्यांशी चर्चा होते. राजकीय मतभेद असतात. पण वैयक्तिक संबंध असतातच ना, असंही त्यांनी सांगितलं.

प्रचाराचा केविलवाणा प्रयत्न

यावेळी त्यांनी शासन आपल्या दारी या कार्यक्रमावर टीका केील. शासन आपल्या दारी या कार्यक्रमातून व्यासपीठावरील नेत्यांना प्रमोट केलं जात आहे. सर्व सामान्यांच्या पैशाने हा नवीन जुमला या सरकारने सुरू केला आहे. करदात्यांचे पैसे जसे जाहिरातीवर खर्च केले जात आहेत. सरकारी यंत्रणा करोडो रूपये खर्च केले जात आहेत. शासन आपल्या दारी आहे तर तुमच्या दारी न्या ना. ग्रामपंचायतीला. जयंत पाटील ग्रामविकास मंत्री असताना प्रत्येक ग्रामपंचायतीला वायफाय देऊन त्यांच्या दारापर्यंत सोयी पोहोचवण्याचं काम केलं होतं. पण हे सरकार तंत्रज्ञानाचा वापर न करता स्वत:च्या प्रचार करण्याचा केविलाणा प्रयत्न करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न

भाजपने घराणेशाही रोखण्यासाठी नेत्यांच्या मुलांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आमच्यात लोकशाही आहे. त्यांच्या पक्षाने कसा निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे, असं त्या म्हणाल्या.

त्यात गैर काय?

काँग्रेसने माढा लोकसभा मतदारसंघात चाचपणी सुरू केली आहे. त्याबाबतही त्यांना विचारण्यात आलं. त्यावर, त्यात गैर काय? प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. काँग्रेस त्यांचा पक्ष वाढवण्याचं काम करत असेल तर गैर काय? त्यांचं स्वागत केलं पाहिजे, असं त्या म्हणाल्या.

Follow Us