पोट भरण्यासाठी पुण्यात आले, ड्रेनेज साफ करण्यासाठी उतरले अन् तिघेही… नेमकं काय घडलं?
पुरंदरमधील एका मशरूम कंपनीत ड्रेनेजची टाकी साफ करताना विषारी वायूमुळे ३ कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. ही दुर्घटना कशी घडली आणि पोलीस तपास काय सांगतो, याची सोप्या भाषेतील माहिती.

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. पुरंदर तालुक्यातील बेलसर येथील एका मशरूम उत्पादन कंपनीत रविवारी सायंकाळी एक अतिशय हृदयद्रावक घटना घडली. सांडपाण्याची ड्रेनेज लाईन साफ करण्यासाठी उतरलेल्या तीन कामगारांचा विषारी वायूमुळे श्वास गुदमरून मृत्यू झाला. ही घटना केवळ अपघात नसून, सुरक्षिततेच्या नियमांकडे झालेल्या दुर्लक्षामुळे घडलेली मोठी दुर्घटना मानली जात आहे.
जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मशरुम उत्पान कंपनीच्या आवारात सांडपाण्याच्या ड्रेनेज लाईनमध्ये अडथळा निर्माण झाला होता. हा अडथळा दूर करण्यासाठी पिंटू राजेश प्रसाद (२३) हा कामगार प्रथम टाकीमध्ये उतरला. मात्र, टाकीत साचलेल्या घातक विषारी वायूमुळे तो गुदमरला आणि तो बेशुद्ध पडला.
पिंटू बराच वेळ बाहेर का येत नाही, हे पाहण्यासाठी व्यास सोहम कुमार (२२) हा दुसरा कामगार खाली उतरला. मात्र तोही विषारी वायूचा बळी पडला. आपल्या सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी शेवटी गौतम रामसुरन कुशवाहा (३६) याने टाकीत उडी घेतली, परंतु तोदेखील विषारी वायूच्या विळख्यातून सुटू शकला नाही. एकामागोमाग एक तीनही कामगार टाकीतच बेशुद्ध पडल्याने कंपनी परिसरात एकच खळबळ उडाली.
जेसीबीच्या साहाय्याने फोडला स्लॅब
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक नागरिक आणि इतर कामगारांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. टाकीचे तोंड अरुंद असल्याने आत जाणे शक्य नव्हते, अखेर जेसीबी मशीन आणण्यात आले. या मशीनच्या साहाय्याने टाकीचा वरचा काँक्रीटचा स्लॅब तोडण्यात आला. त्यानंतर त्या तिघांना बाहेर काढण्यात आले. यानंतर त्यांना तातडीने जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
हे तिन्ही कामगार पोटाची खळगी भरण्यासाठी उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातून पुण्यात आले होते. पिंटू राजेश प्रसाद (२३), व्यास सोहम कुमार (२२), गौतम रामसुरन कुशवाहा (३६) अशी या तिघांची नावे आहेत.
पोलिसांची भूमिका
जेजुरी पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून मृतदेहांचे शवविच्छेदन केले जात आहे. ही दुर्घटना कंपनीच्या निष्काळजीपणामुळे घडली का? कामगारांना सुरक्षिततेची साधने दिली होती का? या सर्व बाबींचा तपास पोलीस करत आहेत.