‘मी मोदींना शत्रू मानत नाही, पण…’, उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Feb 02, 2024 | 9:25 PM

उद्धव ठाकरे यांची आज रायगडच्या माणगाव येथे जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी भाजप, शिंदे गट आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी मोदी यांना उद्देशून एक महत्त्वाचं वक्तव्य केलं.

मी मोदींना शत्रू मानत नाही, पण..., उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
Follow us on

निवृत्ती बाबर, Tv9 प्रतिनिधी, रायगड | 2 फेब्रुवारी 2024 : “माझ्या लोकांवर ईडी, सीबीआय लावता. एवढी हिंमत आहे तर चीनवर सोडा ना… तो घुसलाय तिकडे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शत्रू मानत नाही. पण ते मला मानतात. त्यात माझी काय चूक?”, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. “2014 साली असं काय झालं की तुम्ही युती तोडली. लगेच सांगतात आम्ही हिंदुत्व सोडलं. हिंदुत्व काय बाळासाहेबांचे धोतर आहे काय? आमच्याकडे काळी टोपी नाही. आमच्याकडे काळ्या मनाची माणसं नाहीत. आमच्याकडे भगव्या मनाची भगव्या टोपीची माणसं आहेत”, असं ठाकरे यावेळी म्हणाले. ते रायगडच्या माणगाव येथे बोलत होते. ठाकरे सध्या रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची आज माणगावात सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी भाजवर सडकून टीका केली.

“मुस्लिम लोक आमच्यासोबत आले. त्यांना आमचं हिंदुत्व पटलं. मुस्लिम बांधवांनी आज मला मराठीत असलेलं कुराण दिलं. लगेच टीव्हीवर बातम्या चालवल्या असतील. कुराणचं छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं संरक्षण केलं हे इतिहासात आहे. एक कोण तरी चमचा बोलला बिलकीस बानोची बाजू घेतली म्हणून… मुस्लिम आले तर आम्ही हिंदुत्व सोडलं. नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक पाकिस्तानात कापला नाही? ज्याने भारताची फाळणी केली त्या जिनाच्या थडग्यावर आम्ही डोकं ठेवली नाहीत?”, असे सवाल उद्धव ठाकरेंनी केले.

‘भाजपला बाळासाहेब नेहमी त्यांना कमळाबाई म्हणायचे’

“असं कितीतरी आहे. आम्ही काही बोलायचं नाही यांना हिंदुत्वावरुन? आमचं हिंदुत्व हे आला अंगावर तर घेतलं शिंगावर घेऊ. कुरुलकर ज्याने भारताची माहिती दिली त्याबाबत भाजप त्यांची भूमिका स्पष्ट करा ना. आम्ही आमचं हिंदुत्व काय आहे हे स्पष्ट केलं. चोरीचा मामला आणि जोरजोरात बोंबला. भारतीय जनता पक्षाला बाळासाहेब नेहमी त्यांना कमळाबाई म्हणायचे. मी यासाठी कमळाबाई बोलतोय कारण बाळासाहेबांनी सांगितलं. आम्ही बाळासाहेबांचे विचार सोडणार नाही”, असं ठाकरे म्हणाले.

‘शिवस्मारकाचं काय झालं?’

“मुंबईचा अर्थसंकल्प आज मांडण्यात आला. लोकप्रतिनिधींविना मिंध्यांच्या प्रशासकाने मांडला. 200 वर्षात तरी हा कोकणचा मार्ग होणार आहे की नाही हे देखील सांगा. तुम्हीच शिवस्मारकाचं जलपूजन केलं होतं. त्याचं काय झालं? हे दोन फुल दोन हाफला विचारा. जनतेची सेवा तुमच्या हस्ते करताय करा शिवडी न्हावा शेवाची सुरुवात आपण केली. अनेक संकट आपल्यावर आली पण ते पंतप्रधान आले का? इकडे खूप नुकसान झालं तेव्हा हे घरात येऊन विचारलं का?”, असे प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केले.

‘एक फुल दोन हाफ यांना विचारा’

“वांद्रे ते वरळी सेतू पुलाचे भूमिपूजन केलं तेव्हा सरकार आपलं होतं. पण उद्घाटन काँग्रेस काळात झालं. कोस्टल रोड कामाचं भूमिपूजन माझ्या हस्ते झालं होतं. ते आता पूर्ण झालं. त्याचं उद्घाटन आता पंतप्रधान येऊन करणार आहेत. माझ्या वचनपूर्तीचं उद्घाटन मोदी करताहेत. एक फुल दोन हाफचं काहीही क्रेडिट नाही. अरबी समुद्रात शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे जलपूजन झालं. पुढे काय झालं त्याचं एक फुल दोन हाफ यांना विचारा”, असा टोला ठाकरेंनी लगावला.