रेल्वे नोकर भरती आंदोलन प्रकरण; राज ठाकरे कोर्टात हजर, न्यायालयात नेमकं काय घडलं?

2008 साली रेल्वे भरतीदरम्यान कल्याण रेल्वे स्थानकात मनसे कार्यकर्त्यांकडून उत्तर भारतीय उमेदवारांविरोधात मोठं आंदोलन करण्यात आलं होतं. या प्रकरणात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आज सुनावणी पार पडली.

रेल्वे नोकर भरती आंदोलन प्रकरण; राज ठाकरे कोर्टात हजर, न्यायालयात नेमकं काय घडलं?
raj thackeray
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: May 13, 2026 | 5:03 PM

2008 साली रेल्वे भरतीदरम्यान कल्याण रेल्वे स्थानकात मनसे कार्यकर्त्यांकडून उत्तर भारतीय उमेदवारांविरोधात मोठं आंदोलन करण्यात आलं होतं. या प्रकरणात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणात ठाणे न्यायालयात सुनावणी पार पडली, यावेळी राज ठाकरे देखील हजर होते. यावेळी न्यायाधीशांनी राज ठाकरे यांना काही प्रश्न विचारले, त्याची उत्तर त्यांनी दिली, आता या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 18 मे रोजी होणार आहे.

न्यायालयात नेमकं काय घडलं? 

18.10.2008 ला रेल्वे विभागात परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली हे खरं आहे की खोटं? असा प्रश्न यावेळी न्यायाधीशांनी राज ठाकरे यांना विचारला, या प्रश्नाचं उत्तर देताना हे खोट असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यानंतर तुमच्या विरोधात खोटी केस केली असं तुमचं म्हणणं आहे, त्याचं कारण काय? असा सवाल यावेळी न्यायाधीशांनी राज ठाकरे यांना केला.  यावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी म्हटलं की, तेव्हा मी इथे नव्हतो, काही कारणानिमित्त नाशिकला गेलो होतो.

दरम्यान  ज्या प्रकारे साक्षीदारांनी जवाब नोंदविले – त्यामध्ये आपल्या मनसे कार्यकर्त्यांनी रेल्वेची परीक्षा देण्यसाठी आलेल्या उत्तर भारतीय परीक्षार्थ्यांना लाठी काठी घेऊन  मारहाण केली असा आरोप आहे, याबद्दल तुम्हाला काही बोलायचं आहे का? असा सवालही यावेळी न्यायाधीशांनी राज ठाकरे यांना विचारला. यावर उत्तर देताना हे खोटं असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 18 मे रोजी होणार आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 

2008 साली रेल्वे भरतीदरम्यान कल्याण स्थानकावर परीक्षा देण्यासाठी आलेल्या उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाण करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वेचं देखील मोठं नुकसान केल्याचा आरोप आहे.  या प्रकरणात राज ठाकरे यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल आहे.  राज ठाकरे यांनी परप्रांतीयांना लक्ष्य केले, हिंसाचाराला प्रोत्साहन दिले असा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी या आधीची सुनावणी 11 डिसेंबर 2025 रोजी झाली होती. ज्यामध्ये आपल्याला गुन्हा कबूल नाही, असं राज ठाकरे यांनी कोर्टासमोर सांगितले होते. आपण न्यायालयीन प्रक्रियेला संपूर्णपणे सहकार्य करू असंही राज ठाकरेंनी त्यावेळी कोर्टात म्हटलं होतं.  याच प्रकरणात आता पुन्हा एकदा सुनावणी पार पडली आहे.

Follow Us