दुबार तिबारवाले आले तर तिथेच फटकवा… बडवबडव बडवायचे आणि… राज ठाकरेंनी मोर्चेकऱ्यांना काय सांगितलं?

आज मुंबईत महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा निघाला. या मोर्चाला महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठे नेते शरद पवार, शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि इतर घटक पक्षाचे नेते हजर होते.

दुबार तिबारवाले आले तर तिथेच फटकवा... बडवबडव बडवायचे आणि... राज ठाकरेंनी मोर्चेकऱ्यांना काय सांगितलं?
| Updated on: Nov 02, 2025 | 1:34 AM

मतचोरीवरुन एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभरात मोहिम सुरु केली असताना राज्यातही आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतचोरीचा मुद्दा आला आहे. महाविकास आघाडीने आज ‘सत्याचा मोर्चा’ काढून निवडणूक आयोगाला आव्हान दिले आहे. या मोर्चात महाविकास आघाडीच्या सोबतीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही मोर्चात सहभागी होत विरोधकांची आघाडी मजबूत केल्याचे म्हटले जात आहे. राज ठाकरे यांनी या मोर्चात सहभागी होत मतचोरीच्या प्रकरणावर जोरदार भाष्य केले आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मोर्चाला संबोधन करताना जोरदार भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात मतजोरी आणि दुबार मतदार याचा विषय काढत निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे यांनी मुंबईत लोकसभा मतदार संघाची जुलैपर्यंत दुबार मतदारांची यादीच यावेळी वाचून दाखवली. राज ठाकरे म्हणाले की आता ते म्हणतील पुरावा कुठे आहे. अरे सर्व आकडेच मी वाचून दाखवले आहेत. हे सर्व दुबार मतदार आहेत.

राज ठाकरे म्हणाले की या यादीतील गोंधळावरुन कल्पना येईल महाराष्ट्रात काय प्रकारचा गोंधळ आहे. एवढा पुरावे दिल्यानंतर सांगतात कोर्टाने सांगितलं निवडणूक घ्या. कुणाला घ्या? कशाला घ्या? कुणाला निवडणूकांची घाई आहे. पाच वर्ष निवडणूक झाली नाही. अजून एक वर्ष नाही झाल्या तर काय फरक पडतो. त्यातल्या त्यात निवडणुका घेऊन यश मिळवायचं. याला निवडणूक म्हणतात का ? असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी केला.

राज ठाकरे पुढे म्हणाले की एक आमदाराचा मुलगा सांगतो. मी २० हजार मते बाहेरून आणली. कुणाचं काय समजत नाही. काहीही चालले आहे. नवी मुंबईत आयुक्तांच्या बंगल्यावर मतदार नोंदवले गेलेत. कुणी तरी सुलभ शौचालयात मतदार नोंदवले. कुठेही बसलेला दिसला तर नोंदवायचा का? देशभर ही गोष्ट सुरू आहे. मतदारापर्यंत समजलंय. परवा वोटिंग मशीनबद्दल बोललो. मी २०१७ पासून सांगतो. यात गडबड आहे. साधी गोष्ट आहे. २३२ आमदार निवडून आल्यावर महाराष्ट्रात मातम असेल, सन्नाटा असेल, मतदार गोंधळले असतील त्यांना आश्चर्य वाटत असेल, निवडून आलेल्यांना मी कसा निवडून आलो हा प्रश्न पडला होता. काही तर स्वत :ला चिमटे काढत होते. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कारस्थान सुरू होतं. कशा निवडणुका लढवायच्या. मॅच आधीच फिक्स आहे असा आरोपच राज ठाकरे यांनी केला.

राज ठाकरे यावेळी म्हणाले की उद्या निवडणुका झाल्या तर सांगतो, जेव्हा निवडणुका होतील तेव्हा घरा घरात जा. याद्यांवर काम करा. चेहरे कळले पाहिजे. त्यानंतर जर समजा तिकडे दुबार तिबारवाले आले तर त्यांना तिथेच फोडून काढा. बडव बडव बडवायचे आणि मग पोलिसांच्या हाती द्यायचे. त्याशिवाय हे वठणीवर येणार नाहीत. महाराष्ट्रातील हा कारभार सुधारणार नाही असा इशाराच राज ठाकरे यांनी दिला.