उस्मानाबाद : औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरुन राज्यात जोरदार राजकारण रंगलं आहे. याच मुद्द्यावरुन आज शिवसेनेचे खासदार आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी काँग्रेसच्या सेक्युलरवादावर जोरदार टीका केलीय. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विचारलं असता नामकरणापेक्षा त्या शहरांचा विकास होणं गरजेचं असल्याचं मत टोपे यांनी व्यक्त केलं आहे. राजेश टोपे आज उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंबमधील कृष्णा हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.(Rajesh Tope’s reply to Sanjay Raut on the issue of renaming Aurangabad)
औरंगाबादचं संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराचं नाव बदलून धाराशिव करण्याची शिवसेनेची जुनीच मागणी आहे. शिवसेना नेत्यांकडून आता ही मागणी अधिक आक्रमकपणे करण्यात येत आहे. त्यावर बोलताना नामकरणापेक्षा त्या शहरांचा विकास होणं गरजेचं आहे. उस्मानाबादला धाराशिव म्हणा पण विकास करा, अशी भूमिका टोपे यांनी मांडली आहे. महाविकास आघाडी ही किमान समान कार्यक्रमावर एकत्र आली आहे. तिन्ही पक्षाच्या कोअर कमिटीनं निर्णय घेतल्यास कुठलीही अडचण नाही. नामांतरावेळी जनतेच्या इच्छाही समजून घेतल्या गेल्या पाहिजेत. वेळ देऊन चर्चेतून असे प्रश्न सोडवता येतात, असंही टोपे म्हणाले.
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातील रोखठोक या सदरात संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांच्या नामांतराच्या भूमिकेवर टीका केली आहे. त्यावर विचारलं असता वृत्तपत्रे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. त्यांना लिहिण्याचा अधिकार असतो. त्यांना लिहू द्या, काही अडचण नाही, असं उत्तर राजेश टोपे यांनी दिलं आहे.
‘महाराष्ट्रातील सर्वच पुढाऱ्यांनी औरंगजेबाचा रक्तरंजित इतिहास पुन्हा वाचयला हवा. निदान आपल्या बालपणातील इतिहासाची शालेय क्रमिक पुस्तके तरी नजरेखालून घालायला हवीत. औरंगजेब हा सेक्युलर कधीच नव्हता. त्याने शिवाजी महाराजांचा शत्रू मानलेच, पण छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करुन मारले. असा औरंगजेब संभाजी राजांच्या बलिदानानंतरही पंचवीस वर्षे महाराष्ट्राशी लढत राहिला व शेवटी याच मातीत गाडला गेला. अशा औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात तरी एखादे शहर असू नये. ही धर्मांधता नसून शिवभक्ती म्हणा, महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणा, नाहीतर इतिहासाचा भान; पण असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! हे वागणं सेक्युलर नव्हे!’ अशा शब्दात संजय राऊत यांनी आपलाच सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.
धनंजय मुंडे प्रकरणात विरोधकांनी राजकारण करु नये. त्या प्रकरणात अनेक विषय कोर्टात आहेत. तर पोलिस चौकशीही सुरु आहे. पुढे चालून सत्य समोर येईल. राजकीय नेतृत्व घडायला अनेक वर्षे जातात त्यामुळे यात राजकारण होण योग्य नसल्याचं मत टोपे यांनी व्यक्त केलं आहे.
पुढील काळात 5 ते 6 कंपन्यांच्या लस येणं अपेक्षित आहे. त्यांची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी अंतिम स्वरुपात आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लस उपलब्ध होईल. भारतात लसीची किंमत कमी असून सामान्य लोकांना मोफत लस देण्यावर सरकारचा भर असेल, अशी शक्यताही टोपे यांनी व्यक्त केली आहे.
संबंधित बातम्या :
‘औरंगजेब कुणाला प्रिय?’ रोखठोकमधून काँग्रेसच्या ‘सेक्युलर’वादावर राऊतांचा निशाणा
राज्यातच काय देशातही औरंगजेबाच्या नावाबाबत कुणीही आग्रही असू नये; राऊतांनी काँग्रेसला सुनावले
नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे शिकाऱ्याप्रमाणे ढोल पिटत आहेत; प्रकाश आंबेडकरांची टीका
Rajesh Tope’s reply to Sanjay Raut on the issue of renaming Aurangabad