दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्यासाठी ट्रॅक्टर रॅलीत घातपाताची शक्यता नाकारता येत नाही : राजू शेट्टी

| Updated on: Jan 25, 2021 | 9:21 PM

दिल्लीतील उद्याच्या शेतकरी संचलनामध्ये आंदोलन बदनाम करण्यासाठी घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असं राजू शेट्टी म्हणाले आहेत (Raju Shetti on Delhi Farmers Protest).

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्यासाठी ट्रॅक्टर रॅलीत घातपाताची शक्यता नाकारता येत नाही : राजू शेट्टी
राजू शेट्टी
Follow us on

कोल्हापूर : “दिल्लीतील उद्याच्या शेतकरी संचलनामध्ये आंदोलन बदनाम करण्यासाठी घातपाताची शक्यता नाकारता येत नाही. मात्र आम्ही दक्षता घेतली आहे. असले कारस्थान करण्याच्या भानगडीत पडू नका महागात पडेल”, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. कोल्हापुरात ट्रॅक्टर रॅली दाखल झाल्यानंतर त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला (Raju Shetti on Delhi Farmers Protest).

“कृषी कायद्याला संसदेत व्हावा तितका विरोध झाला नाही. विरोधीपक्ष त्यांच्या विरोधात बोलण्याची हिंमत दाखवत नाहीत. देशातील राजकीय नेते कार्पोरेट हाऊसेसच्या खिशात आहेत. कोणी बरोबर येवो अथवा न येवो, आम्ही लढाई लढणारच”, असा घणाघात राजू शेट्टी यांनी केला (Raju Shetti on Delhi Farmers Protest).

“देशात पुन्हा एकदा शेतकऱ्यांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते शेतकरी कधीही सहन करणार नाहीत. आजचा मोर्चा बळीराजाच्या फौजेचं संचलन आहे. गरज पडल्यास कोणत्याही क्षणी दिल्लीला जाण्यास तयार आहोत”, असं राजू शेट्टी म्हणाले.

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ स्वाभिमनी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ट्रॅक्टर रॅली काढली. ही रॅली सोमवारी सकाळी सांगलीहून निघाली. त्यानंतर ही रॅली संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास कोल्हापुरात दाखल झाली. रॅलीदरम्यान राजू शेट्टी यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बातचित केली.

दरम्यान, मुंबईतदेखील आज शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले. मात्र, या आंदोलकांच्या शिष्टमंडळाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेता आली नाही. कारण राज्यपाल सध्या गोव्याला गेले आहेत. या मुद्द्यावरुन राजू शेट्टी यांनी टीका केली.

“देशात लोकशाही असताना राज्यपालांना राज्यभरातून आलेल्या आदिवासी महिला, शेतकरी यांचं दुःख ऐकायला वेळ नाही. राज्यपाल गोव्याला कामासाठी की पर्यटनासाठी गेलेत मला माहित नाही. मोर्चा आधीच ठरलेला असताना राज्यपाल उपस्थित राहिले नाहीत. हे विशिष्ट लोकांनी विशिष्ट लोकांसाठी चालवलेले सरकार आहे का?”, असा सवाल त्यांनी केला.

संबंधित बातम्या :

असा राज्यपाल पाहिला नाही, त्यांना कंगनाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांना भेटायला नाही : शरद पवार

शेतकऱ्यांना राज्यपालांच्या दौऱ्याची पूर्वकल्पना दिली होती; राजभवनाचे स्पष्टीकरण