उपमुख्यमंत्री ठाण्याचे मग कोकणासाठी काय केलं? राजू शेट्टींचा सवाल, म्हणाले त्यांना मुख्यमंत्री करुन…
कोकणातील आंबा व काजू बागायतदारांच्या नुकसानभरपाईसाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत उद्या धडक मोर्चा निघणार आहे. पोलिसांनी परवानगी नाकारली तरी 'वर्षा'वर जाणारच, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे.

सरकार आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करत आहे. त्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारला आम्ही आता सोडणार नाही. मुंबई पोलिसांनी आमच्या मोर्चाला परवानगी नाकारली असली, तरी आम्ही आंदोलनावर ठाम आहोत. आम्हाला अडवलं तरी आम्ही पुढे जाणार आणि आमचा न्याय मागणारच, असा आक्रमक आणि थेट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिला आहे.
गेल्या काही महिन्यातील प्रतिकूल हवामानामुळे कोकणातील आंबा व काजू बागायतदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानभरपाईसाठी आज शुक्रवारी कोकणातील शेतकरी गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला असा धडक मोर्चा काढणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी सरकारवर कडाडून हल्ला चढवला.
हेक्टरी अवघे २२ हजार? ही तर शेतकऱ्यांची थट्टा!
राजू शेट्टी यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सरकारच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, सरकारच्या मनात आंब्याला हेक्टरी २२ हजार रुपयांपेक्षा जास्त द्यायचं नाही असं सुरू आहे. म्हणजे एका झाडाला अवघे २२० रुपये मिळणार. निर्यात होणारा एक आंबा ५०० रुपयांना विकला जातो. मग शेतकऱ्यांना किमान अर्धी किंमत तरी भरपाई म्हणून मिळायला हवी. शेतकऱ्यांना गृहीत धरण्याची चूक सरकारने करू नये, हे अजिबात सहन केले जाणार नाही, असे राजू शेट्टी म्हणाले.
कोकणावर आलेल्या या संकटाला केंद्र आणि राज्य सरकारचे चुकीचे धोरण आणि बदलते वातावरण कारणीभूत आहे. आंब्याला हेक्टरी ५ लाख आणि काजूला ३ लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत, असेही राजू शेट्टींनी यावेळी सांगितले.
उपमुख्यमंत्री ठाण्याचे मग कोकणासाठी काय केले?
यावेळी राजू शेट्टींनी राजकीय घडामोडींवरही टोला लगावला. बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करावं की मोहित कंबोजला, याच्याशी आम्हाला काही देणंघेणं नाही; आम्हाला फक्त शेतकऱ्यांना न्याय हवा आहे. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत का? जर सुटले असते तर ही वेळच आली नसती. ठाणे कोकणात येत नाही का? त्यांनी कोकणासाठी काय केलं ते आधी सांगावं. कोकणातील शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची भेट घेऊन झाली, पण प्रश्न सुटलेला नाही. ३० जूनपर्यंत सरकारने कर्जमाफी केली नाही, तर आम्ही त्यांच्या मानगुटीवर बसू, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.
मुंबईत पोलिसांची परवानगी नाकारली, तरीही मोर्चा काढणार!
वेंगुर्ला, देवगड, मालवण, रायगड, मुरबाड या भागांतून शेतकरी मोठ्या संख्येने मुंबईसाठी रवाना झाले आहेत. मुंबई पोलिसांनी सुरक्षेचे कारण देत या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. मात्र, राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले की, दुपारी ३ वाजता गिरगाव चौपाटीवर कोकणी माणूस आणि बागायतदार मोठ्या संख्येने एकत्र येतील. तिथून पायी वर्षा बंगल्याकडे कूच करतील. या लढ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबतच शिवसेना (ठाकरे गट), जनता दल सेक्युलर आणि मराठी अभ्यास केंद्र या संघटनाही सहभागी झाल्या आहेत.
मोर्चाची गरज नाही, सकारात्मक निर्णय लवकरच – उदय सामंत
दरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राजू शेट्टींचा हा मोर्चा राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला आहे. मी स्वतः राजू शेट्टी यांच्याशी ३ ते ४ वेळा बोललो आहे. त्यामुळे या मोर्चाची अजिबात आवश्यकता नाही. उद्धव ठाकरे गटाकडून (UBT) त्यांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली जात आहे. त्यांच्यात गैरसमज पसरवला जात आहे. आम्ही ७ लोकांच्या समितीमध्ये असून ठरलेल्या सर्व गोष्टी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातल्या आहेत. महामंडळाचे वाटपही लवकरात लवकर व्हावे ही आमची भूमिका आहे. यानंतर आता आम्ही सुनेत्रा पवार यांनाही या विषयाची कल्पना देऊ. तिथून येणाऱ्या निर्देशांचे पालन करून लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे उदय सामंत म्हणाले.