Rajyasabha Election :शिवसेना-भाजपाची प्रतिष्ठा या 29 आमदारांवर अवलंबून, राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्षांचं वाढलं वजन

| Updated on: Jun 04, 2022 | 8:17 PM

अपक्ष आणि छोट्या पक्षांना एकदम या निवडणुकीने भाव आला असून, मोठा घोडेबाजारही होणार असे संकेत मिळतायेत. काय आहे राज्यसभेचं एकूण गणित आणि का वाढलंय अपक्षांचं आणि छोट्या पक्षांचं महत्त्व जाणून घेऊयात.

Rajyasabha Election :शिवसेना-भाजपाची प्रतिष्ठा या 29 आमदारांवर अवलंबून, राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्षांचं वाढलं वजन
आली मतदानघटिका समिप, मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये वऱ्हाडांची गजबज, मविआचं स्नेहभोजन ट्रायटंडला, भाजप ताजमध्ये तर काँग्रेसचे आमदार रेनिसन्सला
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई – सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आल्याने, आता राज्यसभा निवडणकीत (Rajyasabha Election) चुरशीचा सामना रंगणार हे नक्की झाले आहे. शिवसेनेने (Shivsena) दोन आणि भाजपाने (BJP) प्रत्येकी तीन उमेदवार रिंगणार उतरवल्याने आता दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. त्यातही सहाव्या जागेसाठी होणारी लढत ही कोल्हापूर केंद्रीत असणार आहे. कारण शिवसेनेकडून संजय पवार तर भाजपाने धनंजय महाडिक यांना तिसऱ्या जागेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कोल्हापूर या राजकारणात केंद्रस्थानी आले आहे. आता ही सहावी जागा पदरात पाडून घेण्यासाठी साम-दाम-दंड या सगळ्यांचाच वापर होणार हे नक्की झाले आहे. अपक्ष आणि छोट्या पक्षांना एकदम या निवडणुकीने भाव आला असून, मोठा घोडेबाजारही होणार असे संकेत मिळतायेत. काय आहे राज्यसभेचं एकूण गणित आणि का वाढलंय अपक्षांचं आणि छोट्या पक्षांचं महत्त्व जाणून घेऊयात.

राज्यसभेवर निवडून येण्यासाठी किती मतांची गरज

राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला 42 मते गरजेची आहेत. महाविकास आघाडीचा सत्तेतील बहुमताचा दावा हा 169 आमदारांचा आहे. यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची एकूण संख्या 152 इतकी आहे. त्यातही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे इतके आमदार आहेत.

शिवसेना-55
राष्ट्रवादी-54
काँग्रेस- 44

असे संख्याबळ आहे. प्रत्येकी एक एक उमेदवाराची पहिल्या पसंतीची 42 मते वजा केल्यास, शिवसेनेकडे 13, राष्ट्रवादीकडे 12 आणि काँग्रेसकडे 2 असे एकूण 27 आमदारांचे संख्याबळ महाविकास आघाडीकडे आहे. इतर पक्ष आणि अपक्ष मिळून 16 आमदार आघाडीसोबत आहेत. म्हणजे एकूण सहाव्या जागेसाठी 43 आमदारांचं बळ कागदोपत्री महाविकास आघाडीकडे आहे. यातही अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे तुरुंगात आहेत, त्यांना मतदानाचा अधिकार मिळणार का, याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची 27 मते तिसऱ्या उमेदवाराला जरी मिळाली तरी 16 अपक्ष आणि छोटे पक्ष काय भूमिका घेणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. अशा स्थितीत शिवसेनेला 15 मतांची गरज आहे.

भाजपाचा विचार केल्यास भाजपाचे 106, रासप 1, जनसुराज्य 1 आणि 5 अपक्ष असे 113 संख्याबळ भाजपाकडे आहे. तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपाला 13 आमदारांची गरज आहे. या निवडणुकीत बऱ्याचदा कोटा पूर्ण होण्यासाठी आणि मते बादल झाल्यास काय, म्हणून अधिकची मतेही दिली जातात. अशा स्थितीत आमदारांची गरज वाढण्याचीही शक्यता आहे.

काठावर कोण, यांच्याकडे विशेष लक्ष

महाविकास आघाडीला पाठिंबा दिला असला तरी राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षांची भूमिका स्वतंत्र असू शकते. अशा स्थितीत 29 आमदार जे छोटे पक्ष आणि अपक्ष आहेत. त्यांच्यावर आता शिवसेना आणि भाजपाची प्रतिष्ठा अवलंबून असणार आहे.

या 29 जणांना महत्त्व

भाजपासोबत 4 अपक्ष
मविआसोबत 9 अपक्ष
बविआ 3
प्रहार 2
सपा 2
एमआयएम 2
मनसे 1
क्रांतिकारी शेतकरी 1
स्वाभिमानी 1
माकप 1
शेकाप 1
जनसुराज्य 1
रासप 1
या 29 जणांच्या भूमिकेवर सहावी जागा ठरणार आहे.

सध्या कुणाची काय भूमिका?

बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांनी महाविकास आघाडीवर नाराज असल्याचे सांगितले असले तरी अंतिम निर्णय मतदानाच्या दिवशीच घेऊ असे त्यांनी सांगितले आहे. त्यांच्याकडे तीन आमदार आहेत. सपाच्या अबु आझमी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून या निवडणुकीत तटस्थ राहणार असल्याचे सूचित केले आहे. भाजपासोबत असलेले अपक्ष आमदार रवी राणा यांनी अपक्षांनी पत्ते पिसलेले आहेत असा दावा केला आहे. आणि भाजपाचाच उमेदवार निवडून य़ेईल असे त्यांनी सांगितले आहे. तर या निवडणुकीत भाजपा केंद्रीय यंत्रणांचा दबाव आमदारांवर टाकत असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. मात्र मतदानाच्या दिवशीच सगळं स्पष्ट होईल आणि शिवसेनेचाच उमेदवार निवडून येईल असा दावाही राऊतांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सहाव्या जागेच्या मतांची बेगमी झाल्याचे सांगत भाजपाचाच उमेदवार निवडून य़ेईल असे सांगितले आहे.

सस्पेन्स कायम

महाविकास आघाडी आणि भाजपा दोघांकडेही त्यांची स्वताचा सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेशी मते नाहीत. आघाडीला 4 आमदारांची तर भाजपाला 13 आमदारांची गरज आहे. अशा स्थितीत कोण नेमकं कुणाला हात देतं, यावर ही सगळी निवडणूक रंगणार आहे. 10 जूनला मतदान होईपर्यंत याचा सस्पेन्स कायम राहणार आहे. यात आता किती घोडेबाजार होतो, हे पाहावं लागणार आहे.