मोठी बातमी! विमानतळाच्या आत गोळीबार; 2 जण जखमी, प्रवाशांमध्ये एकच खळबळ
वाराणसी विमानतळाच्या आत गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन कर्मचारी जखमी झाल्याची माहिती हाती आली आहे.

उत्तर प्रदेशातील वाराणसी विमानतळाच्या आत मोठी घटना घडली आहे. लाल बहादूर शास्त्री विमानतळाच्या आत एअर इंडियाच्या विमानाने मुंबईला जाणाऱ्या आजमगडच्या एका प्रवाशाने गोळीबार केला आहे. पिस्तुलातून गोळीबार केल्यानंतर फरशीला धडकून थेट विमानतळावरील एका तरुणात्या हाताला लागली. तर एका महिलेच्या मांडीला लागली. या घटनेत एका महिलेसह दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. यात एका महिलेचाही समावेश आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गोळीबाराच्या घटनेने एकच विमानतळावर खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, आजमगढमध्ये राहणारा एका प्रवासी एअर इंडियाच्या विमानाने मुंबईला निघाला होता. सुरक्षेच्या प्रक्रियेचा भाग म्हणून या प्रवाशाने पिस्तुलाविषयीची माहिती अधिकाऱ्यांना दिली होती. विमानतळावर प्रवाशाच्या हातातील पिस्तुलातील गोळी जमिनीला आदळली. त्यानंतर या प्रवाशाच्या जवळ उभे असलेल्या तरुणाच्या हात आणि एका महिलेच्या मांडीला गोळी लागली. या घटनेत दोन्ही कर्मचारी जखमी झाले. गोळी लागल्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वाराणसी विमानतळाचे संचालक पुनीत गुप्ता यांच्या माहितीनुसार, विमानतळावर पिस्तुल आणि त्याच्या पेपरची माहिती घेतली जात होती. त्याचवेळी पिस्तुलातून गोळी सुटली. पिस्तुलाची तपासणी केली जात होती, त्यावेळी पिस्तुलाचा मालक आणि स्टाफ देखील उपस्थित होते. विमानतळावर महिला आणि पुरुषाला गोळी लागली, त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनाक्रम आला समोर
विमानतळ संचालक पुनीत गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळावर ही घटना सकाळी सुमारे 9:30 वाजताच्या सुमारास घडली. आजमगढचा रहिवासी असलेला प्रवासी हा त्याच्या पत्नीसह विमानाने मुंबईला जाण्यासाठी निघाला होता. त्यावेळी या प्रवाशाकडे पिस्तुल आणि मॅगझिन होते. त्यामुळे नियमांनुसार, प्रवाशाने त्याच्या पिस्तुलाची माहिती सुरक्षा यंत्रणेला दिली होती. पिस्तुल आणि परवान्याची तपासणी सुरू असताना अचानक गोळी सुटली. पिस्तुलातील गोळी सर्वात प्रथम जमिनीवर आदळळी. त्यानंतर जवळ उभ्या असलेल्या 2 कर्मचाऱ्यांना लागली.
