
केंद्र सरकार दरवर्षी आरोग्य क्षेत्रावर हजारो कोटींचा खर्च करते. सर्व सामान्य लोकांना स्वस्तात चांगले उपचार मिळावेत यासाठी अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र तरीही रुग्णांचा चांगले उपचार मिळत नसल्याचे समोर आले आहे. कारण मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मीरा भायंदरमधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा हात चक्क उंदराने कुरतडल्याचे समोर आले होते. त्यामुळे रुग्णालयाच्या हलगर्जी कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. मात्र आता संबंधित रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचे समोर आले आहे. नेमकं काय घडलं याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मिरा-भाईंदर शहरातील पंडित भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयातून अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. या रुग्णालयात 12 मार्चला एका 89 वर्षीय महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या महिलेला रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र रविवारी रात्री या महिलेचा हात उंदराने कुरतडा होता. यामुळे आयसीयुमध्ये असलेल्या रुग्णाकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे.
कोणत्याही रुग्णालयाच्या आयसीयू सारख्या विभागात सामान्य लोकांना प्रवेश दिला जात नाही, मात्र आयसीयूमध्ये उदरांनी उच्छाद मांडल्याचे समोर आले होते. आज सकाळी 6 वाजता घरचे नातेवाईक पेशंटला पहायला गेले असता हात कुरतडनारा उंदीर पळून गेला. त्यावेळी महिलेच्या हाताला जखम झाल्याचे आढळले होते. यावेळी कर्तव्यावरील डॉक्टर किंवा नर्सेस यांच्या रात्रभर ही बाब लक्षात आली नाही.
यानंतर आता आज सायंकाळी या महिलेचा मृत्यू झाला आहे. रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका वृद्ध महिलेला जीव गमवावा लागल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता केली जात आहे. दरम्यान, यापूर्वीही अशाच घटना समोर आल्या होत्या.