रयत क्रांती संघटनेचा एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा; इस्लामपूरमध्ये एकदिवसीय उपोषण

इस्लामपूरमध्ये सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनला रयत क्रांती संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली आज इस्लामपूर बसस्थानकामध्ये एकदिवसीय उपोषण करण्यात आले.

रयत क्रांती संघटनेचा एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा; इस्लामपूरमध्ये एकदिवसीय उपोषण
| Edited By: | Updated on: Nov 06, 2021 | 5:53 PM

सांगली – एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न आता चांगलाच चिरघळला आहे. आपल्या विविध मागण्यासांठी राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी रस्त्यावर उतरले असून जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तो पर्यंत आंदोलन सुरूच राहाणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. आतापर्यंत राज्यात तब्बल 37 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दरम्यान इस्लामपूरमध्ये सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनला रयत क्रांती संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली आज इस्लामपूर बसस्थानकामध्ये एकदिवसीय उपोषण करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी आणि रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

… तो पर्यंत शांत बसणार नाही

एसटी कर्मचाऱ्यांची परिस्थिती अत्यंत हालाकीची बनली आहे. ते तुटपुंज्या वेतनावर कसातरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांना वेतन देखील वेळेवर मिळत नाही. वेतनवाढ मिळावी, वेतन वेळेत व्हावे तसेच एसटीचे विलगीकरण करून कर्मचाऱ्यांना क वर्गाचा दर्जा द्यावा अशा मागण्या या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत शांत बसणार नसल्याचे खोत यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून महाविकास आघाडी सरकारवर देखील निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटी महामंडाळाचे प्रचंड नूकसान झाले आहे. एसटीचे कर्मचारी संकटात सापडले आहेत. तब्बल 37 जणांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली, याला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

‘सरकार जनतेला मृत्यूच्या खाईत लोटत आहे’

दरम्यान आज अहमदनगरमधील शासकीय रुग्णालयाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना देखील खोत यांनी संताप व्यक्त केला. राज्यातील आरोग्य खाते गटारगंगा झाली आहे. सरकार जनतेला मृत्यूच्या खाईत लोटत आहे. अहमदनगरपूर्वी देखील अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत, मात्र सरकारला वसुलीशिवाय दूसरे काहीच सूचन नाही. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आता तरी जनतेला टोप्या घालणे बंद करावे, अशी टीका खोत यांनी केली. तसेच मृतांच्या नातेवाईकांना योग्य ती भरपाई देण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

संबंधित बातम्या 

Special Report : राज्यात रुग्णालयांमधील दुर्घटनांचे सत्र सुरुच! कधी वायुगळती तर कधी आग, रुग्णांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार?

अहमदनगर शासकीय रुग्णालयातील आगीच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होणार?

Ahemadnagar Hospital Fire : मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखाची मदत, आरोग्यमंत्र्यांची घोषणा; जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी होणार