
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील दुर्दैवी विमान अपघातानंतर संपूर्ण राज्य अद्यापही धक्क्यातून सावरलेले नाही. या भीषण अपघाताबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अत्यंत गंभीर आणि तांत्रिक मुद्दे उपस्थित करत खळबळजनक दावा केला आहे. या सदर विमानाचे रजिस्ट्रेशन बेकायदेशीर होते आणि ते मुद्दाम व्हीआयपी लोकांसाठी वापरले गेले का, असा सवाल त्यांनी विचारला आहे.
रोहित पवार यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या विमानांच्या देखभालीबाबत रोहित पवार यांनी स्पष्टीकरण दिले. यावेळी त्यांनी विमानाचे रंगकाम घरी किंवा साध्या गॅरेजमध्ये करता येत नाही, त्यासाठी संबंधित कंपनीकडेच जावे लागते ज्यासाठी ३ ते ४ कोटींचा खर्च येतो. मात्र, या प्रकरणात विमानाचे रंगकाम संशयास्पद रतीने करण्यात आल्याचे दिसते. अपघातानंतर विमानाची शेपटी जळाल्यावर त्यावर एक लपलेला नंबर स्पष्ट झाला, असे रोहित पवार म्हणाले.
रोहित पवारांच्या दाव्यानुसार, त्यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे काही धक्कादायक बाबी समोर आणल्या आहेत. या विमानाच्या शेपटीवर N8QPQ हा नंबर दिसून आला, जो युएस (US) रजिस्ट्रेशनचा आहे. अमेरिकेतील संपर्काचा वापर करून माहिती काढली असता, या विमानाचे ५ वेगवेगळे मालक असून त्यात काही फायनान्स कंपन्यांचाही समावेश आहे. भारतात लेअरजेट (Learjet) विमानांचे रजिस्ट्रेशन काही तांत्रिक कारणांमुळे होऊ शकत नाही. मात्र, या प्रकरणात डीजीसीए (DGCA) अधिकार्यांचा वापर करून हे विमान बेकायदेशीररीत्या रजिस्टर केल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे.
हे स्वस्तातील विमान मुद्दाम व्हीआयपींच्या प्रवासासाठी वापरले गेले का? तसेच या प्रकरणाशी संबंधित असलेली व्हीएसआर (VSR) कंपनी अचानक का बंद झाली?” असे प्रश्न विचारत रोहित पवारांनी या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. नियमानुसार सीव्हीआरमध्ये 2 तासांचा आवाज रेकॉर्ड होणे आवश्यक आहे. या विमानात फक्त 30 मिनिट रेकॉर्ड होऊ शकत होते. तसेच, भारतात 90 कोटींची हाय-टेक लॅब असताना ब्लॅक बॉक्स तपासासाठी कॅनडाला का पाठवला, असा सवाल त्यांनी केला. अपघात झाल्यानंतर चौकशीची ऑर्डर काढायला 4 दिवस का लागले, असा प्रश्न त्यांनी विचारला. तसेच, डीजीसीएच्या वेबसाईटवरून अकाउंटेबल मॅनेजरचे नाव का हटवले, असा संशय रोहित पवारांनी व्यक्त केला. या दाव्यांमुळे आता विमान सुरक्षा आणि प्रशासकीय कामकाजावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.