
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात निवृत्तीबद्दल विधान केलं. “कार्यापासून निवृत्ती कधी होत नाही. मरेपर्यंत काम करणारी लोकं आहेत. शरीर चालतं तोपर्यंत काम करतात. वयाच्या पंच्याहत्तरीनंतर विना दायित्त्वाचं काम केलं पाहिजे, असं आम्ही मानतो. त्याला संघाची परवानगी मिळाली तर होईल,” असं उत्तर त्यांनी दिलं. यावेळी भागवत यांनी आरएसएस प्रमुख कोण होऊ शकतं, याबद्दलही मोठं वक्तव्य केलं. आरएसएस प्रमुख कोणत्याही जातीचा नसावा. ब्राह्मण, क्षत्रिय किंवा इतर कोणत्याही जातीचा असणं आवश्यक नाही, फक्त अट अशी आहे की नियुक्त केलेली व्यक्ती हिंदू असावी, असं त्यांनी स्पष्ट केलं.
“माझं सांगायचं झालं तर मला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. मी कार्यकर्त्यांना म्हणालो, झालं आता. ते म्हणाले, तुम्हाला काय झालं? फिरत आहात. काम करा अजून. त्यामुळे मी थांबलो. मी इथे असावं ही माझी इच्छा नाही. कार्यकर्त्यांची राहत नाही. मी या ठिकाणी राहू नये हा माझा ऑप्शन नाही. हा संघाचा ऑप्शन आहे. त्यामुळे संघ जेव्हा सांगेल तेव्हा दायित्वातून निवृत्ती होते. कार्यातून निवृत्ती नाही. दायित्त्वातून निवृत्ती झाली तरी कार्य सुरूच राहतं. शरीराची सक्रियता असेपर्यंत काम सुरू राहतं. निवृत्तीची वयोमर्यादा नाही. एखादी व्यक्ती जेव्हा म्हणतो मला निवृत्त व्हायचं आहे, तेव्हा कारण पाहून निवृत्ती दिली जाते. कुणाला निवृत्त करावं कधी, अशी वेळ आली नाही. अशी वेळ येऊ नये ही इच्छा आहे,” असं भागवत पुढे म्हणाले.
मोहन भागवत यांनी मुंबईत आयोजित आरएसएस शताब्दी समारंभात हे वक्तव्य केलं. या कार्यक्रमात अनेक प्रमुख व्यक्तींनी सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी इंग्रजी भाषेच्या वापराबद्दलही आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितलं की त्यांना इंग्रजी भाषेवर कोणताही आक्षेप नाही. आम्हाला भारतीय लोकांमध्ये काम करायचं आहे. आमचा कोणत्याही भाषेशी झगडा नाहीये. आपण जे आहोत ते आम्हाला बनून राहायचं आहे.