बैलगाडा शर्यतीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, पशुसंवर्धन मंत्रालयाची नियमावली : वाचा सविस्तर
प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध कारण्याबाबत अधिनियम, 2017 च्यानियमांचे पालन करून राज्यात बैलगाडी शर्यतीच्या आयोजनास राज्य सरकारने परवानगी दिली. या नियमांचा भंग झाल्यास गुन्हे दाखल करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

मुंबई : राज्य सरकारच्या पाठपुराव्याने बैलगाडा शर्यतीला महाराष्ट्रात परवानगी मिळाली आहे. बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील बैलगाडा शर्यत सुरु करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे, या संदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन पशुसंवर्धन ,दुग्ध व्यवसाय आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले आहे.
पशुसंवर्धन मंत्री केदार म्हणाले, प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध कारण्याबाबत अधिनियम, 2017 च्यानियमांचे पालन करून राज्यात बैलगाडी शर्यतीच्या आयोजनास राज्य सरकारने परवानगी दिली. या नियमांचा भंग झाल्यास गुन्हे दाखल करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
बैलगाडा शर्यतीस सशर्त परवानगी
उच्च न्यायालयाच्या बंदी आदेशामुळे राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून बैलगाडा शर्यंत बंद होती. या प्रकरणी शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. गेल्याच आठवड्यात न्यायालयाने बैलगाडा शर्यतीस सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. त्यानुसार राज्य सरकारने मंजूर केलेल्या अधिनियम, 2017 च्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून बैलगाडी शर्यत आयोजनास पशुसंवर्धन विभागाने परवानगी दिली असून त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
बैलगाडा शर्यतीत अनेकदा बैलांचा छळ
बैलगाडा शर्यतीत अनेकदा बैलांचा अमानुष छळ केला जातो, त्यांना वेगाने पळवण्यासाठी इलेक्ट्रीक शॉक दिला जातो. त्यांना मारहाण करण्यासह इतर अनेक पद्धतीने त्रास दिला जातो. याच बाबी लक्षात घेऊन काही प्राणीमित्रांनी बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्याची मागणी केली होती, त्यानुसार गेली अनेक वर्षे राज्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी होती, मात्र ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पाहिले जाते, यात्रेच्या दिवसात मोठ्या प्रमाणात बैलांच्या शर्यती भरवल्या जातात.बैलगाडा शर्यत ही एक परंपराच आहे. त्यामुळे वारंवार शेतकऱ्यांकडून बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याची मागणी होत होती, मात्र पुन्हा बंदी येऊ द्यायची नसेल तर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होणे आवश्यक आहे.
