रूपाली चाकणकर यांचा अखेर राजीनामा, सात ओळींच्या पत्रात काय म्हटलंय? भोंदूबाबा प्रकरणात पहिली विकेट

सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

रूपाली चाकणकर यांचा अखेर राजीनामा, सात ओळींच्या पत्रात काय म्हटलंय? भोंदूबाबा प्रकरणात पहिली विकेट
Rupali Chakankar
Image Credit source: Google
| Updated on: Mar 20, 2026 | 10:10 PM

सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. चाकणकर यांना नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण भोवलं आहे. अशोक खरातला एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता या अशोक खरातचे अनेक कारनामे समोर आले होते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खरात सोबतचे फोटो आणि त्याची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ समोर आला होते. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. त्यानंतर आता चाकणकर यांनी राजीनामा दिला आहे.

CM फडणवीस यांच्या आदेशानंतर राजीनामा

काही वेळापूर्वी रूपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी राजीनामा दिला आहे. चाकणकर यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. चाकणकर यांनी राजीनामा पत्रात काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

रुपाली चाकणकर यांनी पत्रात काय म्हटलं?

रुपाली चाकणकर यांनी राजीनामा पत्रात म्हटले की, मी, सौ. रुपाली निलेश चाकणकर, वरील विषयान्वये आपणांस विनंतीपूर्वक कळवू इच्छिते की, दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजी माझी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली होती. माझ्या वैयक्तिक कारणाने मी स्वेच्छेने सदर पदाचा राजीनामा ह्या पत्राद्वारे आपणांस सादर करत आहे.

आजवर माझ्यावर विश्वास दाखवून आपण मला सर्वतोपरी सहकार्य केले त्याबद्दल मी आपली व सर्व सहकाऱ्यांची शतशः ऋणी आहे. भविष्यातही आपले असेच सहकार्य राहील असा मला विश्वास आहे. तरी आपण माझा अध्यक्षा, राज्य महिला आयोग ह्या पदाचा राजीनामा स्वीकारावा अशी आपणांस नम्र विनंती आहे.

भोंदूगिरी करणारे सर्वच जेरबंद होतील – बावनकुळे

नाशिकमध्ये बलात्कार प्रकरणांमध्ये पोलिसांनी अशोक खरातला अटक केली आहे. यावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, ‘या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्या सर्वांवर कारवाई सरकारच्या वतीने करण्यात येईल आणि सर्व दोषींना जेरबंद करण्यात येईल. तसेच अशा पद्धतीने अनेक भोंदू बाबा आश्रम उघडतात त्यामध्ये काय कार्य करतात हे अनेक वेळा पोलिसांना देखील माहित नसते असेही बावनकुळे म्हणाले.

Follow Us