‘आंदोलक आतंकवादी’, त्या विधानावर सदाभाऊ खोत यांचं स्पष्टीकरण, म्हणाले मी तर…
मी जे विधान केले ते इंडिया आघाडीशी संंबंधित होते. इंडिया आघाडी आणि त्या आघाडीतील पक्ष या आंदोलनाच्या आडून दहशतवादी विचार राज्यात आणि देशात पसरवत आहेत, असं मी बोललो होतो, असं स्पष्टीकरण सदाभाऊ खोत यांनी दिलं.

Sadabhau Khot : सध्या दिल्लीमध्ये अभिजित दीपके यांच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलन सुरू आहे. नीट पेपरफुटीच्या प्रकरणामुळे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी भूमिका आंदोलकांची आहे. सध्या दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर हजारो आंदोलक उपस्थित आहेत. या आंदोलनस्थळी शेकडो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दुसरीकडे अनेक बडे राजकीय नेते आंदोलनस्थळी जाऊन दीपके यांची भेट घेत आहेत. दरम्यान, या सर्व घडामोडी घडत असताना आमदार सदाभाऊ खोत यांनी आंदोलकांची दहशतवाद्यांशी तुलना केली. त्यांच्या वादग्रस्त विधानावर आक्षेप व्यक्त केला जातोय. आता यावरच खोत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
मोदी यांचे सरकार हटवण्यासाठी आंदोलन
विद्यार्थ्यांचे जे मत आहे त्या मताच्या आम्ही सोबत आहोत. परंतु विद्यार्थ्यांच्या प्रश्नांच्या माध्यमातून जे राजकारण केले जात आहे, त्याला मी विरोध करतो. मीदेखील विद्यार्थ्यांसोबत आंदोलन केलेले आहे. आता नीटच्या मुद्द्यावरून आंदोलन केले जात आहे की मोदी यांचे सरकार हटवण्यासाठी आंदोलन केले जात आहे हेच समजत नाही. या आंदोलनाचा नेमका मुद्दा काय आहे, तेच समजायला मार्ग नाही. हे आंदोलन भरकटले आहे. हे आंदोलन सरकारच्या विरोधात आहे, असा गंभीर आरोपही खोत यांनी केला.
काही लोक आंदोलनात औरंगजेबाचे फोटो घेऊन गेले होते. औरंगजेब आणि नीट परीक्षेचा संबंध काय. हे आंदोलन दंगल घडवण्यासाठी केले जात आहे. आंदोलन करण्याचा सर्वांनाच हक्क आहे. सरकार त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे. नीट परीक्षेत जो घोटाळा झाला, त्या प्रकरणाती आरोपींना पकडण्यात आले आहे. आता नीटची परीक्षा नव्याने झाली आहे. त्यामुळे या आंदोलनाला काही अर्थ उरत नाही. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली जात आहे. हे चुकीचे आहे, असे मत खोत यांनी व्यक्त केले.
दहशतवादी विधानावर काय दिले स्पष्टीकरण?
मी जे विधान केले ते इंडिया आघाडीशी संंबंधित होते. इंडिया आघाडी आणि त्या आघाडीतील पक्ष या आंदोलनाच्या आडून दहशतवादी विचार राज्यात आणि देशात पसरवत आहेत, असं मी बोललो होतो. सोशल मीडियावर पाहिलं तर महाविकास आघाडीचे काम असेच चाललेले आहे. विद्यार्थ्यांसाठी आम्हीदेखील लढा उभारलेला आहे. नीट पेपरफुटीचा मुद्दा आता बाजूला पडला आहे. मुद्द्याला सोडून हे आंदोलन केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या मोदी सरकारविरोधात घोषणा आहेत. सरकार हटवाची त्यांची भूमिका आहे.