Sadabhau Khot : बांबू काढल्यावर पडायला सरकार म्हणजे काय छप्पर आहे काय?, ते आपोआप पडणारच; सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल

| Updated on: Jun 15, 2022 | 1:48 PM

Sadabhau Khot : सदाभाऊ खोत यांनी मीडियाशी संवाद साधताना विविध प्रश्नावर प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरही टीका केली.

Sadabhau Khot : बांबू काढल्यावर पडायला सरकार म्हणजे काय छप्पर आहे काय?, ते आपोआप पडणारच; सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल
सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सोलापूर: बांबू काढल्यावर पडायला राज्यातील आघाडी सरकार हे काय छप्पर आहे काय? असा सवाल करतानाच ते सरकार आपोआपच पडणार आहे. हे सरकार (maha vikas aghadi) पडलेलंच आहे, असा घणाघाती हल्लाबोल रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांनी चढवला आहे. यावेळी सदाभाऊ खोत यांनी एका गोष्टही ऐकवली. एकाद्याला लग्न करायची हौस असते. लग्न करुन बायको घरात येते. लेकरं बाळं झाली की बायकोला धडूक कपडा मिळत नसतो. कारण नवरा हा चैनीखोर असतो. तो गावभर फिरत असतो. सांगतो की बायको पळून जाणार आहे. मग्न लग्न करताना तुला कळले नाही का? तू चैनी करणार त्यांना धडूक कपडा देणार नाही. घराकडे लक्ष देणार नाही मग बायको पळून जाणार म्हणून बोंब मारतोस… आधी घराकडे लक्ष दे…, अशी उपरोधिक टीकाही सदाभाऊ खोत यांनी आघाडी सरकारवर (maharashtra government) केली.

सदाभाऊ खोत यांनी मीडियाशी संवाद साधताना विविध प्रश्नावर प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरही टीका केली. सरकारने जनतेच्या प्रश्नावर बोलायला पाहिजे. पण मुख्यमंत्री घरात बसतात आणि युवराज देश वाऱ्या करत असतात. आज ते अयोध्येच्या स्वारीवर गेलेत. ज्यांनी अयोध्येच्या मंदिराच्या वर्गणीमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले आणि गोंधळ घातला, ज्यांनी राम मंदिर बांधायची यांच्यात हिंमत नाही असे विधान केले होते, तेच आता आयोध्येला निघालेत.म्हणजे यांना रामाचाही जप करायचा आहे आणि काँग्रेस वगैरे आहेत त्यांना हिरवे झेंडे खांद्यावर घेऊन नाचायचे आहे. एका म्यानात दोन तलवारी राहतील कश्या? त्या राहू शकत नाहीत. मग तुम्ही रामाला जावा, नाहीतर काशीला जाऊन आंघोळ करा. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातून तुम्ही संपलेले आहात, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.

हे सुद्धा वाचा

कोण कोण येडे आहेत ते कळेल

परिवहन मंत्री अनिल परब यांना आलेल्या ईडीच्या नोटिशीवरूनही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ज्यांच्याकडे ईडी चौकशीला जातेय ते भाग्यवान माणसे आहेत. कारण लक्ष्मी सोनपावलाने त्यांच्या दारात अवतरली आहे. लक्ष्मी ज्यांच्या घरी सोनपावलाने अवतरली त्याच्याकडे ईडीने जावे म्हणजे कोण कोण येडे आहेत ते महाराष्ट्राला कळेल, असा टोला त्यांनी लगावला.

अन् शेजाऱ्याला झोप येईना

शरद पवारांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करा असं म्हटलं नाही, त्याबद्दल संजय राऊत यांचं अभिनंदनच आहे. पवार साहेबांनी सांगितले की, मी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार नाही. गावगाड्यात म्हण आहे की, ज्याचं त्याला कळेना आणि शेजाऱ्याला रात्रभर झोप येईना. त्यामुळे संजय राऊत रात्रभर जागलेत. त्यामुळे ज्याचे त्याला कळेल की काय करायचे. राऊतांचे म्हणणे म्हणजे शिळ्या कडीला ऊत आणण्यासारखे आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

त्यात वावगं काय?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काल देहूत भाषण करू दिलं नाही. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मला या लोकांचे हसू येते. काही घडले की महाराष्ट्राचा अपमान होतो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताहेत हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? तुमची संपत्ती, तुमचा सातबारा महाराष्ट्राच्या नावावर करा बघू तुमची दानत आहे का? मला वाटते महाराष्ट्राचा बिलकूल अपमान झालेला नाही. सुप्रिया ताईंनी तो शपथविधी आठवावा मग त्यांच्या लक्षात येईल की प्रोटोकॉलप्रमाणे झाले की नाही. प्रोटोकॉलप्रमाणे आधी मुख्यमंत्री बोलतात आणि मग उपमुख्यमंत्री त्यात वावगं काय?, असा चिमटाही त्यांनी काढला. अजितदादा आणि देवेंद्रजी एकत्र तेव्हा महाराष्ट्र त्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून बघतो, असंही ते म्हणाले.