Sahitya Sammelan|साहित्य संमेलनाच्या तारखा जाहीर; उदगीरमध्ये कन्नड, उर्दू, तेलगूचाही होणार सन्मान…!

| Updated on: Jan 09, 2022 | 7:06 AM

लातूर जिल्ह्यात होणारे हे पहिले साहित्य संमेलन आहे. या संमेलनाचे निमंत्रण अध्यक्ष भारत सासणे यांना त्यांच्या घरी जावून देण्यात आले आहे.

Sahitya Sammelan|साहित्य संमेलनाच्या तारखा जाहीर; उदगीरमध्ये कन्नड, उर्दू, तेलगूचाही होणार सन्मान...!
Sahitya Sammelan
Follow us on

नाशिकः अखेर उदगीरमध्ये होणाऱ्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली. उदगीर येथील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कथाकार आणि लेखक भारत सासणे यांची निवड झाली आहे. यापूर्वी नाशिकमध्ये गेल्याच महिन्यात 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी खगोलतज्ज्ञ जयंत नारळीकर होते.

कोणत्या तारखांना संमेलन?

उदगीरमध्ये होणारे साहित्य संमेलन 22 ते 24 एप्रिल दरम्यान होणार आहे. या संमेलनाचे निमंत्रक महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, उदगीर ही संस्था आहे. या संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांनी सासणे यांच्या पुणे येथील घरी जावून त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांना संमेलनाचे निमंत्रण आणि अभिनंदन पत्र देण्यात आले. लातूर जिल्ह्यात होणारे हे पहिले साहित्य संमेलन आहे. तसा उदगीर हा सीमावर्ती भाग. या परिसरात मराठी, कन्नड, उर्दू आणि तेलगू या भाषा बोलल्या जातात. या संमेलनात या चारही भाषांचा सन्मान होईल, अशा पद्धतीने कार्यक्रमाची आखणी करण्यात येणार आहे, अशी माहिती निमंत्रकांनी अध्यक्षांना दिली.

हिंडता-फिरता अध्यक्ष

95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद निवडीसाठी उदगीरमध्ये बैठक झाली. या बैठकीत ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. विशेष म्हणजे यापूर्वीच्या नाशिक येथे झालेल्या साहित्य संमेलनाला अध्यक्ष जयंत नारळीकर यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थिती लावली नव्हती. त्यामुळे कौतिकराव ठाले-पाटील यांनी आता पुढचा अध्यक्ष हिंडता-फिरता रहावा, अशी जाहीर इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर सासणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

कोरोनाचे सावट

साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील म्हणाले की, एप्रिलमध्ये उदगीर येथे 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. एप्रिल बावीस ते चोवीस दरम्यान तीन दिवशी कार्यक्रम होतील. संमेलनाचे निमंत्रण नवीन अध्यक्षांना दिले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. मात्र, दुसरीकडे यंदाही साहित्य संमेलनावर कोरोनाचे सावट असणार आहे. त्यामुळे हे संमेलन कदाचित मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये घ्यावे लागू शकते. जर कोरोनाची तिसरी लाट ओसरली, तर संमेलन दणक्यात होईल.

इतर बातम्याः

Special News| साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नारळीकर यांचे अनकट अन् डोळ्यांत अंजन घालणारे स्फोटक भाषण…!

Nashik| मी या भाषेत फडफडत राहीन, कोलटकरच्या भिजक्या वहीवरचं कासव कवेत घेईन; अन् अख्खे कविसंमेलन भारावले…!

Girish Kuber| समाजाचे अवैचारिकरण, प्रगल्भतेची आस आहे का, कुबेरांचा सवाल; पत्रकारिता सत्य विसरली, डोळेंचे खडे बोल!