ईडब्ल्यूएस आरक्षण तुम्ही घ्या, 10 टक्के आरक्षण आम्हाला द्या; मनोज जरांगे पाटील यांचं ओबीसी नेत्यांना आव्हान

| Updated on: Nov 12, 2023 | 10:34 AM

गोरगरीब धनगर समाजाला न्याय द्यावा म्हणून आम्ही गेलो होतो. त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला, नाही दिला तरी आम्ही धनगर समाजाच्या पाठी राहणार आहोत. गोरगरीब धनगरांना आरक्षण मिळावं ही आमची मागणी आहे. त्यासाठी त्यांच्या खांद्याला खांदा लावू, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. जरांगे पाटील यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. त्यापूर्वी त्यांनी मीडियाशी संवाद साधला.

ईडब्ल्यूएस आरक्षण तुम्ही घ्या, 10 टक्के आरक्षण आम्हाला द्या; मनोज जरांगे पाटील यांचं ओबीसी नेत्यांना आव्हान
manoj jarange patil
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

दत्ता कानवटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, संभाजीनगर | 12 नोव्हेंबर 2023 : मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षण घेण्याचा हट्ट करू नये. त्यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र घेऊन आरक्षणही घेऊ नये. त्यातून त्यांना काहीच फायदा होणार नाही. ओबीसींनी ईडब्ल्यूएसमधून आरक्षण घ्यावं. त्यातून त्यांचा फायदाच होणार आहे, असा सल्ला ओबीसी नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी त्यावर ओबीसी नेत्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्हीच ईडब्ल्यूएस आरक्षण घ्या आणि दहा टक्के आरक्षण आम्हाला द्या. ईडब्ल्यूएसचा एवढा फायदा होत असेल तर तुम्ही एवढी वाटणी कराच, असं प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटील यांनी दिलं आहे.

मनोज जरांगे पाटील हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. तुम्हाला तीन टक्केच आरक्षण मिळणार आहे का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर जरांगे पाटील यांनी उत्तर दिलं आहे. कायदा म्हणतो लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिलं जातं. त्यामुळे आम्हाला 50 टक्के आरक्षण हवं. तेवढं आरक्षण आम्हाला मिळणार आहे. साडेतीन नाही फाडेतीन नाही. लोकसंख्येच्या प्रमाणात मिळणार आणि आम्ही ते घेणार, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

येडं समजता व्हय आम्हाला

ईडब्ल्यूएसचं डबल डबल काढू नका. ते तुम्हाला घ्या आणि त्याबदल्यात 10 टक्के आरक्षण आम्हाला द्या. डोंगराचं वावर आम्हाला दिलं. जे वावर पिकत नाही ते दिलं आम्हाला. आणि काळी जमीन तुम्ही घेतली. येडं समजता व्हय आम्हाला. ज्यात औतच चालत नाही ते आम्हाला देत आहेत. तुम्हालाच घ्या ना ईडब्ल्यूएस. वाटण्या झाल्या आपल्या. 10 टक्के आरक्षण द्या आम्हाला, असं ते म्हणाले.

तारीख मागे पुढे नाही

दमानं का होईना पण आम्ही आरक्षण घेणारच. घेतल्याशिवाय राहणार नाही. 24 तारीख बदलण्याचा संबंध नाही. तारीख मागेपुढे होईल असं मी म्हटलं नाही. ते फक्त मराठा तरुणांसाठी म्हटलं होतं. आरक्षण देण्यासाठी मागं पुढे होईल पण जीव गमवावू नका असं आवाहन मी मराठा तरुणांना म्हटलं होतं, असंही त्यांनी सांगितलं.