संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना पत्र, आणखी एका मंत्र्याच्या हकालपट्टीची मागणी

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मंत्री जयकुमार रावल यांच्यावर बँक घोटाळ्याचे गंभीर आरोप केले आहेत. रावळ यांनी रावल को-ऑपरेटिव्ह बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना पत्र, आणखी एका मंत्र्याच्या हकालपट्टीची मागणी
sanjay raut devendra fadnavis
| Updated on: Mar 18, 2025 | 4:01 PM

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी राज्याचे पणनमंत्री आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मंत्री जयकुमार रावल यांनी बँकेची लूट केल्याचा आरोप आहे. तसेच माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी जमीन लाटल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. आता संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून जयकुमार रावल यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. जयकुमार रावल भाजपचे असल्याने त्यांना संरक्षण मिळत आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी लिहिलेल्या पत्रात आपल्या मंत्रिमंडळातून जयकुमार रावल यांच्या भ्रष्टाचाराची दखल घेऊन त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे. जयकुमार रावल यांनी रावल को ऑपरेटिव्ह बँकेमध्ये कोट्यावधी रुपयांचे घोटाळे केले. कुटुंबातील खोटे कर्जदार तयार करुन कोट्यवधी रुपये लाटले. तसेच माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची २६ एकर जमीन हडपणाचा प्रयत्नही केला. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र पाठवणार असल्याचे संजय राऊतांनी म्हटलं आहे.

संजय राऊतांचे पत्र

“राजकीय मंडळींच्या हस्तक्षेपामुळे महाराष्ट्रातील अनेक सहकारी व नागरी बँकांचे वाटोळे झाले व त्यात सामान्य ठेवीदारांचे अतोनात नुकसान झाल्याचे रोज समोर येत आहे. जॉर्ज फर्नांडिस यांनी स्थापन केलेल्या न्यू इंडिया बँकेतही अशाच मनमानी, बेकायदेशीर पद्धतीने कर्ज वाटप झाल्याने हजारो ठेवीदारांचे नुकसान झाले व त्यातील आरोपी मुंबई पोलिसांच्या अटकेत आहेत.

दोंडाईच्या जनता सहकारी बँक (कै. दादासाहेब रावल जनता सरकारी बँक) या बँकेत मोठ्या प्रमाणात अफरातफर झाली. बिगर गॅरंटीचे कर्ज वाटप, कोणतीही गॅरंटी न घेता ९८ कोटींचे कर्ज वाटप आपल्या जवळच्याच नातेवाईकांना बँकेच्या राजकीय मालकानी दिले. इतकेच नव्हे तर बँकेच्या कार्यक्षेत्राबाहेर गुजरातमधील नातेवाईकांनाही कोट्यवधी रुपये दिले. हे गंभीर स्वरूपाचे गुन्हेगारी कृत्य आपल्या मंत्रिमंडळातील जयकुमार रावल यांनी केले”, असे आरोप संजय राऊत यांनी पत्रात केले आहेत.

सामान्य जनतेलाही सोडले नाही आणि राष्ट्रपतीनांही सोडले नाही

“या प्रकरणाचा निष्पक्ष तपास राजकीय दबावामुळे होऊ शकला नाही. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना झाली व चौकशी अहवालानुसार मंत्री जयकुमार रावल हे बैंक घोटाळा प्रकरणात आरोपी क्रमांक तीन आहेत. असे एसआयटीचा अहवाल सांगतो. या प्रकरणात अटक होऊ नये म्हणून रावल हे इतर ५५ आरोपींसह फरारी झाले. याच काळात यातील काही आरोपींनी ‘एसआयटी’ तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण केले.

आपल्याकडून म्हणजेच तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हा तपास ‘सीआयडी’कडे सोपवण्यास भाग पाडले. बैंक लुटीच्या भ्रष्ट प्रकरणात मंत्री रावल हे आकंठ बुडाले आहेत व जनतेच्या पैशांची लूट करून सत्ता भोगणे हा भयंकर अपराध आहे. रावल यांचे वर्तन हे लोकप्रतिनिधीस शोभणारे नाही. अशी व्यक्ती मंत्रिमंडळात असले तर महाराष्ट्राच्या जनतेने कोणता आदर्श बाळगावा ? रावल यांच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे देता येतील. पण खोट्या कागदपत्रांच्या आधारे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची २६ एकर जमीन हडपणाचा रावल यांचा प्रयत्न उच्च न्यायालयाने हाणून पाडला आहे. हे प्रकरणदेखील गुन्हेगारी स्वरूपाचेच आहे. सामान्य जनतेलाही सोडले नाही व राष्ट्रपतीनांही सोडले नाही. याचे इनाम म्हणून हे महाशय मंत्रीपदी आहेत काय?” असे संजय राऊतांनी पत्रात म्हटले आहे.