जर तुमच्याकडे इतकं प्रेम असेल तर…; देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर संजय राऊत कडाडले

विधानपरिषदेत एकाच दिवसात १५० कोटींचा घोडेबाजार झाल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या विधानाचा समाचार घेत त्यांनी वैभव नाईक यांच्या चौकशीवरूनही प्रश्न उपस्थित केले.

जर तुमच्याकडे इतकं प्रेम असेल तर...; देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर संजय राऊत कडाडले
sanjay raut devendra fadnavis
| Updated on: Jun 07, 2026 | 10:50 AM

महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा पैसा आणि सत्ता या मुद्द्यावरून जोरदार कलगीतुरा रंगला आहे. माणसं प्रेमाने जिंकता येतात पैशाने नाही, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला. विधानपरिषदेत प्रचंड मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार झाला, हे सत्ताधाऱ्यांनी मान्य करावे, असे संजय राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी थेट ५० कोटी आणि १५० कोटींच्या कथित व्यवहारांचे आकडे जाहीर करत खळबळ उडवून दिली आहे.

संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीतील घोडेबाजाराबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले. “जर सगळं काही प्रेमानेच जिंकता येतं, तर मग तो ५० कोटीं’चा प्रकार काय होता? केवळ तुमच्यासोबत सरकार स्थापन करण्यासाठी जे येत आहेत, त्यांच्यावरच हे ५० कोटींचं प्रेम कशासाठी? जर तुमच्याकडे इतकं प्रेम असेल, तर महाराष्ट्रात लाखो गरीब लोक राहतात, ज्यांना पैशांची खरोखर गरज आहे, हे ५० कोटी त्या गरिबांच्या घरात पोहोचवा, मग आम्ही समजू तुम्ही प्रेमाने जग जिंकताय”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

एकाच दिवसात १५० कोटींचा खर्च कशासाठी?

“या निवडणुकीत ज्या जागा बिनविरोध होऊ शकत होत्या, तिथे घोडेबाजार करण्यासाठी एकाच दिवसात १५० कोटी रुपये खर्च करण्यात आले. हे १५० कोटी रुपये कोणी आणले? कुठून आणले? आणि कोणाला वाटले? हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण शिंदे गटाला नीट ठाऊक आहे. महाराष्ट्रात सध्या लोकशाहीचा नाही, तर पैशांचा खेळ सुरू आहे.” असे गंभीर आरोप संजय राऊत यांनी केले.

“तुमच्याकडे आमच्या हजार गोष्टी असतील, तर आमच्याकडेही तुमच्या हजारो गोष्टी आहेत. त्याचे पत्ते पिसत बसण्याशिवाय महाराष्ट्रात दुसरं काम उरलेलं नाही का? तुम्ही समोर बसा, आम्ही समोर बसतो; होऊन जाऊ दे दूध का दूध आणि पाणी का पाणी”, असेही ओपन चँलेंज संजय राऊत यांनी दिले.

वैभव नाईक यांच्यावरील कारवाईवरून गृहमंत्र्यांवर निशाणा

तसेच केंद्रीय तपास यंत्रणा आणि पोलिसांच्या कारवाईवरून संजय राऊत यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. शिवसेना (UBT) आमदार वैभव नाईक यांच्या पाठीमागे गेल्या ५ ते ६ वर्षांपासून चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला आहे. वैभव नाईक जेव्हा जेव्हा पक्षात आणि मतदारसंघात सक्रिय होतात, लोकांचे प्रश्न मांडायला लागतात, की लगेच दुसऱ्या दिवशी त्यांच्या हातामध्ये चौकशीची नोटीस दिली जाते. हा निव्वळ राजकीय सूडबुद्धीचा प्रकार आहे. अशा नोटिसा फक्त विरोधकांनाच का येतात? सत्ताधारी पक्षात धुवून पवित्र झालेल्यांना नोटिसा का जात नाहीत? गृहमंत्री म्हणून फडणवीसांनी या पक्षपाती कारभारात तातडीने लक्ष घातलं पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

Follow Us