IMD Monsoon Update : आभाळ फाटणार, राज्यात पावसाचा रेड अलर्ट, हवामान विभागाकडून मोठा इशारा
राज्यात पुन्हा एकदा पाऊस चांगलाच सक्रिय झाला आहे, पावसाने चांगला जोर पकडला असून, महाराष्ट्रात पुढील काही तासांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्रात 1 जुलै ते 8 जुलै या काळात चांगला पाऊस झाला होता, या पावसानंतर राज्यातील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, परंतु त्यानंतर पावसाने अचानक उघडीप दिली, पाण्याभावी पीके सुकू लागली होती. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा वीस जुलैपासून पावसाचा जोर वाढल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान राज्यात आता पावसाचा जोर आणखी वाढणार आहे, पुढील 24 तासांसाठी हवामान विभागाकडून (IMD) पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे, मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. घाट माथ्यावर पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
काय आहे हवामान विभागाचा नवा अंदाज
येत्या चार ते पाच दिवस राज्यात चांगला पाऊस होईल, पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मान्सून सक्रिय झाल्याने राज्यातील अनेक धरणे भरणार असून, पाण्याची चिंता दूर होणार आहे. पावसासंदर्भात माहिती घेण्यासाठी भारतीय हवामान विभागाच्या मेघदूत अॅपचा वापर करावा, तसेच शेतकऱ्यांनी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच पेरणी करावी अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख एसडी सानप यांनी दिली आहे.
कोकणात पावसाचा जोर वाढणार
दरम्यान अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पुढील चार ते पाच दिवस कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे. किनार पट्टी भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यात आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर वाढणार आहे. मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्याला पावसाने झोडपलं
दरम्यान दुसरीकडे गेल्या दोन दिवसांपासून पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे, या पावसामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील काही गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. तसेच गुरुवारी विरारवरून डहाणूच्या दिशेनं जाणाऱ्या रेल्वे गाड्या देखील पावसामुळे विस्कळीत झाल्या होत्या, त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.
