इराण-इस्रायल युद्धामुळे भारतात… संजय राऊतांनी व्यक्त केली मोठी भीती, म्हणाले मोदींमुळेच…

खासदार संजय राऊत यांनी अमेरिका-इराण युद्धावरून मोदी सरकारवर टीका केली असून, भारत 'गुलाम' झाला असल्याचा आरोप केला आहे. दिल्लीतील पुतळे आणि अजित पवार यांच्या मृत्यूवरही भाष्य केले.

इराण-इस्रायल युद्धामुळे भारतात... संजय राऊतांनी व्यक्त केली मोठी भीती, म्हणाले मोदींमुळेच...
sanjay raut pm narendra modi
| Updated on: Mar 01, 2026 | 11:24 AM

सध्या अमेरिका-इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षाचे पडसाद भारतात उमटू लागले आहेत. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी संजय राऊतांनी इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूच्या वृत्तावर भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, हे युद्ध केवळ परदेशात मर्यादित नाही. पंतप्रधान मोदी दोन दिवसांपूर्वीच इस्रायलहून परतले आणि दुसऱ्याच दिवशी इराण-इस्रायलमध्ये युद्ध पेटले. हा योगायोग असू शकत नाही. मोदींचे ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्याशी जवळचे संबंध आहेत. तर मग युद्ध सुरू होतानाच त्यांनी ते थांबवायला हवे होते, असे संजय राऊतांनी म्हटले.

काश्मीर प्रश्नावर इराण नेहमी भारताच्या बाजूने उभा राहिला आहे. भारताला इराणकडून अत्यंत स्वस्त दरात तेल मिळत होते. आता या युद्धाचा परिणाम म्हणून तेलाचे भाव वाढून महागाईचा फटका भारताला बसेल, अशी भीती संजय राऊतांनी व्यक्त केली. यावेळी संजय राऊतांनी भारताने अमेरिकेशी केलेल्या ट्रेड डीलवरही टीका केली. या ट्रेड डीलमुळे भारत अमेरिकेचा गुलाम झाला आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

युद्धजन्य परिस्थितीत इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांवरून संजय राऊत यांनी परराष्ट्र खात्यावर निशाणा साधला. इराणमधील विमानतळांवर हल्ले झाले आहेत. पर्यटकांसह अनेक भारतीय तिथे अडकले आहेत. पुण्यातले एक कुटुंबही अडकले आहे. भारतीय परराष्ट्र खाते आता काय करणार? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला.

यावेळी संजय राऊतांनी दिल्लीतील लुटियन्स भागात पुतळे हटवण्यावरूनही राऊत यांनी सरकारला घेरले. लुटियन्स हे केवळ आर्किटेक्ट नव्हते. मॅडम कामा यांनी काँग्रेसची स्थापना केली होती, तर सी. राजगोपालचारी हे मोठे नेते होते. त्यांचे पुतळे हटवून काय साध्य होणार? मोदी विदेशी घड्याळ आणि गाड्या का वापरतात? इंग्लंडच्या पंतप्रधानांना मिठी का मारतात? मग स्वदेशीचे काय झाले? असा टोला संजय राऊतांनी लगावला.

Follow Us