
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच एका कार्यक्रमामुळे राजकीय वर्तुळातील सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. भाजपचे फायरब्रँड नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली. यानंतर अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. आता या प्रकरणावर खासदार संजय राऊत यांनी आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय शत्रू असला तरी त्याच्याकडे जर एखाद्या मंगल कार्याचे आमंत्रण असेल तर ती आपली संस्कृती आहे की तेवढ्यापुरती कटुता दूर ठेवून आपण सहभागी व्हावं आणि निघून जावे, असे संजय राऊत म्हणाले.
भाजप नेते मोहित कंबोज आणि ठाकरे परिवार यांच्यात जुना वाद आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोहित कंबोज यांनी ठाकरेंवर सातत्याने गंभीर आरोप केले होते. अगदी शिवसेना फोडण्यामागेही मोहित कंबोज यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. अशा परिस्थितीत, मोहित कंबोज यांच्या घरच्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावल्याने अनेकांना धक्का बसला. सोशल मीडियावर या भेटीचा व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर ठाकरे-भाजप जवळीकता वाढली का? अशी चर्चा सुरू झाली.
आता या सर्व घडामोडींवर संजय राऊतांनी भाष्य केले. कोणी एखाद्या शुभकार्याला बोलवले तर तिथे जाणे चुकीचे नाही. तो कौटुंबिक कार्यक्रम होता आणि तिथे अनेक क्षेत्रांतील लोक उपस्थित होते. आदित्य ठाकरे तिथे थोड्या वेळासाठी गेले होते, असे मी वाचले आहे. अशा मंगल कार्याला कुणी निमंत्रित केले असेल, तर त्यावर राजकारण करणे योग्य नाही, असे संजय राऊत म्हणाले.
राजकीय शत्रू असला तरी त्याच्याकडे एखाद्या मंगल कार्याचे आमंत्रण असेल, तर तेवढ्यापुरती कटुता दूर ठेवून सहभागी होणे ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे. तो राजकीय सोहळा नव्हता, त्यामुळे त्याकडे राजकीय दृष्टिकोनातून बघू नये, असेही संजय राऊतांनी सांगितले. तसेच राजकीय संघर्ष कधीही संपत नाही, तो कायम सुरूच राहतो. मात्र, वैयक्तिक संबंध आणि सार्वजनिक जीवनातील शिष्टाचार पाळणे हे वेगळे असते. एखादा व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून त्याचा अर्थ राजकीय जवळीक असा लावणे चुकीचे आहे, असेही संजय राऊतांनी नमूद केले.
शिंदेंनी आधी बोलावू तर द्या
यावेळी पत्रकारांनी संजय राऊत यांना जर एकनाथ शिंदे यांनी बोलावले तर तुम्ही जाल का? असा सवाल विचारला. त्यावर संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत टोला लगावला. “त्यांनी आधी बोलावू तर द्या. त्यांच्याकडे सध्या कोणतेही शुभ कार्य आहे असे मला वाटत नाही, त्यांची सर्व कार्ये पार पडली आहेत, असे संजय राऊत म्हणाले.