Sanjay Raut : एकनाथ शिंदे यांचे 35 आमदार फुटणार, या खास व्यक्तीची भाजपकडून नियुक्ती; संजय राऊत यांचा नवा बॉम्ब

संजय राऊत यांनी राज्यातील नगरपालिका-नगरपंचायत निवडणुकांतील पैशांच्या वापरावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री व सरकारकडून मोठ्या प्रमाणावर पैशांचा खेळ सुरू असून निवडणूक आयोगाने लक्ष घालण्याची मागणी त्यांनी केली. 'अमित शाह शिंदे गटाचा कोथळा काढतील', असा गंभीर आरोप करत, शिंदे गट भाजपनिर्मित असल्याचेही राऊत म्हणाले. पैशांवर राजकारण करणे लोकशाहीला धोका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Sanjay Raut : एकनाथ शिंदे यांचे 35 आमदार फुटणार, या खास व्यक्तीची भाजपकडून नियुक्ती; संजय राऊत यांचा नवा बॉम्ब
संजय राऊत यांनी टाकला नवा बाँब
Image Credit source: TV9 Marathi
Updated on: Dec 01, 2025 | 11:45 AM

राज्यातं निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच महायुतीत पक्ष वाढीवरून वाद उफळल्याचे दिसून आले. मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, असे वक्तव्य करून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महायुतीत काहीच आलबेल नसल्याचे सूतोवाच केले होते. महायुतीमधील वादांवर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासादर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केलं आहे.  शिंदे सेनेचा कोळथा हे दिल्लीचे अमित शहा काढणार असे म्हणतच शिंदेंचे 35 आमदार फुटणार. रविंद्र चव्हाण हे डोंबिवलीचे आहेत, प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती यासाठी करण्यात आली आहे, असा दावाही राऊत यांनी केला.

आजारपणामुळे राऊत हे महिनाभर राजकारणात सक्रीय नव्हते, आता उपचारानंतर आज ते माध्यमांसमोर आले, तेव्हा त्यांनी शिंदे गटासह भाजपावर जोरदार टीका करत त्यांना खडे बोल सुनावले. शिंदे यांचे 35 आमदार फुटणार असा पुनरुच्चार त्यांनी केला.

काय म्हणाले राऊत ?

निवडणुका उद्यावर येऊन ठेपल्या आहेत आणि मंत्री म्हणतात 1 तारखेला लक्ष्मी दर्शन होईल. निवडणूक आयोगाने याकडे लक्ष दिलं पाहिजे. नगर पालिका नगर पंचायत निवडणुकीत जशी सुरू आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत नगरपालिका किंवा नगरपंचायत निवडणुकीमध्ये पैशांचा इतका प्रचंड खेळ कधी झाला नव्हता. राज्याचे मुख्यमंत्री किंवा सरकार, हे मुळात नगरपालिका किंवा नगरपंचायत निवडणुका लढवतच नव्हेत, आता एकेका निवडणुकीसाठी 10 -15 कोटीचं बजेट आहे, 5-6 हेलिकॉप्टर आहेत. ही सत्तेतल्या 3 पक्षांतील स्पर्धा आहे, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर हल्ला चढवला. इतके कोट्यावधी रुपये खर्च करून कोणासाठी लढताय असा सवाल विचारत या राज्याची निवडणूक संस्कृती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे, किती पैसे खर्च करावेत याला काही मर्यादाच उरलेली नाही अशीही, ही तिन्ही पक्षातील स्पर्धा आहे, अशी टीका राऊतांनी केली.

शिंदेंचे 35 आमदार फुटणार 

शिंदे शिवसेना वि. भाजप अशी स्पर्धा निवडणुकीत दिसत आहे का असा सवाल राऊत यांना विचारण्यात आला. मुळात शिंदे यांची शिवसेना असं म्हणायला आम्ही तयार नाही. आणि शिंदे सेनेचा कोळथा हे दिल्लीचे अमित शहा काढणार हे लिहून घ्या. त्यांनी आमचा कोथळा काढायचा प्रयत्न केला होता पण आम्ही बाहेर पडलो. पण त्यांच्या स्वभावानुसार, कार्यपद्धतीनुसार शिंदे सेनेचा कोथळा हा दिल्लीतूनच काढला जाईल. शिंदेचे 35 आमदार फुटणार. ज्या पद्धतीने त्यांनी शिवसेनेबाबत केलं, त्याच पद्धतीने शिंदे यांचे आमदार फोडण्याचं काम अगदी व्यवस्थित सुरू आहे. रवींद्र चव्हाण हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांची नेमणूक त्यासाठीच केलीआहे. हे राजकारण समजून घेतलं पाहिजे.

यांना (शिंदे) वाटत असेल की दिल्लीचे 2 नेते आमच्या पाठीशी आहेत, पण ते कोणाचेच नाहीत, कोणाच्याच पाठिशी नाहीत. त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसताना मागेपुढे पाहीलं नाही, तर मग हे शिंदे कोण ? शिंदे तर त्यांनीच पाळलेले आहे. शिंदे यांचा पक्ष आधीच फुटलेला आहे. हा अमित शहा यांनी निर्माण केलेला गट आहे, हा अमित शहांचा पक्ष आहे, शिंदेंचा पक्ष नाही. यांनी (शिंदे) कधी शिवसेने साठी खस्ता खाल्ल्यात? हे कधी शिवसेनेसाठू तुरूंगात गेले ? कधी आंदोलनं केली ? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. पैशाच्या ताकदीवर निवडणुका जिंकणं म्हणजेच लोकशाही नाही अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली. फडणवीस यांचं राजकारण शिंदे यांना कळतं नसेल तर त्यांनी करू नये. फक्त पैशावर राजकारण चालत नाही. पैशावर लोक विकत घेता येतात असंही ते म्हणाले.