Sanjay Raut : यंदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्ली ऐवजी गुजरातमध्ये, खवळलेल्या राऊतांनी विचारलं, लोकांनी पुरस्कार घ्यायला गुजरातला का यावं?
Sanjay Raut : "हजारो विद्यार्थी लोकसेवा आयोगाच्या संदर्भात,भरती प्रक्रिया, परीक्षेसंदर्भात रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्र सरकार नेहमीप्रमाणे कमिटी स्थापन करत आहेत. या अशा कमिट्यांनी काय होणार, यात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वत:ला काही बाबतीत तरी निष्पक्ष काही संवैधानिक संस्था तिथे राजकीय आपल्या मर्जीतली माणस घुसवणं बंद करतील त्या दिवशी विद्यार्थ्यांना न्याय मिळेल" असं संजय राऊत म्हणाले.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा नॅशनल फिल्म अवॉर्ड प्रथमच राजधानी दिल्ली बाहेर होणार आहे. गुजरातमध्ये हा सोहळा रंगणार आहे. त्यावरुन खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “नॅशनल फिल्म फेस्टिव्हल सारखा राष्ट्रीय उत्सव गेली 72 वर्ष देशाच्या राजधानीत होत होता, तो सुद्धा गुजरातला घेऊन चालला आहात, मोदी गुजरातचे पंतप्रधान आहेत का?. मंत्रिमंडळ गुजरातचं आहे का?” अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली. “ते संपूर्ण देशाची संपत्ती, देशाचा अभिमान एका राज्याकडे वळवत आहेत. राष्ट्रीय पुरस्कार राजधानीमध्ये झाले पाहिजेत. लोकांनी पुरस्कार घ्यायला गुजरातला का यावं?” असा सवाल राऊतांनी विचारला.
“ज्यांना स्वाभिमान आहे देशाविषयी त्यांनी गुजरातला जाऊ नये” असं आवाहन संजय राऊत यांनी केलं. “मी असं म्हणत नाही की, हा पुरस्कार सोहळा मुंबईत, लखनऊमध्ये झाला पाहिजे. राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याची परंपरा आहे, जे राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हातून दिले जातात. तो पुरस्कार सोहळा तुम्ही गुजरात, अहमदाबादला कसा घेऊन जाऊ शकता?” असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
बाकी सगळे गुजरातचे गुलाम आहेत
“नॅशनल फिल्म अवॉर्ड सोहळा राजधानी दिल्लीत झाला पाहिजे. अनेक राज्यांचं महत्व कमी करायचं, या देशात गुजरात एकमेव राज्य आहे, बाकी सगळे गुजरातचे गुलाम आहेत अशा मनोवृत्तीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह काम करतायत” अशी टीका संजय राऊत यांनी केली. तुम्ही कलाकारांना आव्हान करताय का? गुजरातला जाऊ नका, त्यावर राऊतांनी ‘स्वाभिमान असेल तर नाही जाणार दिल्लीतच झाला पाहिजे कार्यक्रम’ असं उत्तर दिलं.
मोदींचे फोटो हटवले त्याचं समर्थन होतय ते यासाठीच
“मी कुठल्या राज्यावर टीका करत नाहीय. पण राष्ट्रीय सोहळे देशाच्या राजधानीत न होता, भविष्यात गुजरातमध्ये निवडणूक आहे म्हणून तिथे होणार असेल तर ते चुकीचच आहे. भिंतीवरुन मोदींचे फोटो हटवले त्याचं समर्थन होतय ते यासाठीच. हे सद्गृहस्थ स्वत:ला गुजरातचे पंतप्रधान समजतात” अशी टीका राऊत यांनी केली.
काय झालं त्या पुराव्यांचं?
सत्ताधारी पक्ष म्हणतोय ही आंदोलनं राजकीय हत्यारं म्हणून वापरली जात आहेत, त्यावर राऊतांनी लगेच का वापरायची नाहीत? असा प्रतिप्रश्न केला.”विरोधी पक्षाचं काम काय? तुम्ही काय केलं असतं?. गाडीभर पुरावे घेऊन येणार होता, कोणी नाटकं केली? काय झालं त्या पुराव्यांचं?” असे प्रश्न राऊत यांनी विचारले.