
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर खळबळ उडाली. अत्यंत क्रूरपणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर थेट आरोप करण्यात आले. या प्रकरणातील सर्व आरोपी तुरूगांत असून मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार आहे. त्याचा शोध गेल्या कित्येक महिन्यांपासून घेतला जातोय. मात्र, पोलिसांच्या हाती काही तो येत नाही. आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात अत्यंत मोठी अपडेट पुढे येत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे याला दिलासा मिळाला. भावाच्या बाराव्याच्या विधीकरिता त्याला त्याच्या गावी जाण्याची परवानगी कोर्टाने दिली. मात्र, ही परवानगी देताना काही नियम आणि अटी दिल्या आहेत, ज्याचे पालन आरोपीला करावे लागणार आहे. जयराम चाटे याला पोलिस बंदोबस्तमध्ये घेऊन गेले जाणार आहे. त्यानंतर काही तासात त्याला पुन्हा तुरूंगात आणले जाईल.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे याला जिल्हा न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला. दिवंगत भाऊ श्रीराम चाटे यांच्या बाराव्या दिवसाच्या धार्मिक विधीसाठी 13 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पोलिस बंदोबस्तात उपस्थित राहण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. मकोका विशेष न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांनी मानवतावादी दृष्टिकोनातून हा निर्णय दिला.
आरोपीच्या वकिलांनी सर्व अटींचे पालन करण्याची तसेच पोलिस बंदोबस्ताचा खर्च भरण्याची तयारी दर्शवली होती. आरोपीवर गंभीर गुन्हे असल्याने त्याला बाहेर सोडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला होता. पण कोर्टाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर एक दिवसाची मर्यादित परवानगी जयराम चाटे याला दिली आहे.
तब्बल 14 महिन्यानंतर जयराम चाटे हा काही तासांसाठी तुरूंगाच्या बाहेर येईल. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर कोणीही आरोपी बाहेर येऊ शकला नाही. आता काही तासांसाठी 14 महिन्यानंतर जयराम चाटे त्याच्या गावी धार्मिक विधी करण्याकरिता जाईल आणि परत त्याला तुरूगांत ठेवले जाणार आहे.