Shivrajyabhishek sohala : दुग्धाभिषेक, आतषबाजी अन् मिरवणूक, ‘शिवप्रतिष्ठान’कडून साताऱ्यातल्या ‘शिवतीर्थ’वर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा याच्या तिथी आणि तारखेवरून शिवप्रेमींमध्ये दोन गट आहेत. त्यात मराठी तिथीनुसार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदयीला काही शिवप्रेमी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करतात.
कराड, सातारा : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून (Shivpratishthan Hindustan) कराड शहरातील शिवतीर्थ येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा (Shivrajyabhishek sohala) साजरा होत आहे. हजारो शिवप्रेमीच्या उपस्थितीत वेदमंत्रांच्या घोषात अभिषेक आणि महापूजा करण्यात झाली. यावेळी वाद्यांच्या गजरात शिवमूर्तीची पालखीतून ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी मिरवणूक काढण्यात आली. आज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदयी आहे. याच तिथीला शिवाजीराजांचा राज्याभिषेक झाला. सर्व सण एका बाजूला आणि शिवराज्याभिषेक एका बाजूला, एवढे या सणाचे महत्त्व आहे. त्यामुळे हा सण सर्वांनी उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणात साजरा करायला हवा, असे मत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान धारकरी सागर आमले (Sagar Amle) यांनी यावेळी व्यक्त केले. याचदिवशी शिवरायांना हिंदुस्थानच्या समाजाला आपण स्वतंत्र असल्याची जाणीव करून दिली, असेही ते म्हणाले.
शिवप्रेमींमध्ये गट
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा याच्या तिथी आणि तारखेवरून शिवप्रेमींमध्ये दोन गट आहेत. कोल्हापूर संस्थानचे संभाजीराजे शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर आले होते. या उत्सवाला लोकोत्सवाचे स्वरूप प्राप्त व्हावे, यासाठी तसेच उत्सवात पावसाचा व्यत्यय टाळण्यासाठी हा उत्सव त्यांनी तारखेनुसार साजरा करण्याची घोषणा त्यांनी काही वर्षांपूर्वी केली होती. तर आज काहीजण मराठी तिथीनुसार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदयीला काही शिवप्रेमी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करतात. त्याप्रमाणे आज शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे साताऱ्यातील कराड याठिकाणी उत्साहात शिवराज्याभिषेक साजरा करण्यात आला. येथील शिवतीर्थ याठिकाणी धारकरी जमले होते. तुतारी तसेच फटाक्यांची आतषबाजी यासह मिरवणूकही सकाळी निघाली होती.
‘आम्हाला बळ द्यावे’
आपण या भूमीचे पुत्र आहोत. किती दिवस गुलामी करायची, म्हणून याच भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतमातेच्या मस्तकावर संरक्षणाचे छत्र ठेवलं. म्हणून शिवाजी महाराजांना आपण छत्रपती म्हणतो. या शिवरायांचा अभिषेक संपन्न झाल्यानंतर ते रायगडावर देवदर्शनाला गेले. स्वराज्यासाठी त्यांनी बळ मागितले, असे धारकरी सचिन आमले म्हणाले. कराडचे ग्रामदैवत कृष्णामाईचे दर्शन घेण्यासाठी आम्ही दरवर्षी जात असतो. यावर्षीही हा सोहळा उत्साहात साजरा करत आहोत. देशाचा हा उद्ध्वस्त होत चाललेला संसार नीट करण्यासाठी आम्हाला बळ द्यावे, अशी शिवरायांच्या चरणी प्रार्थना सचिन आमले यांनी केली.