राखाडीचं जेवण बाधलं… 22 जण थेट रुग्णालयात; विषबाधा झाल्याने शहापूरमध्ये खळबळ

शहापूर तालुक्यातील शिळ गावात राखाडीच्या जेवणातून 22 जणांना विषबाधा झाली आहे. उन्हामुळे अन्न लवकर खराब होत असल्याने, शिळे अन्न थंड पाण्यात ठेवले असूनही ते बाधले. जेवणानंतर अनेकांना उलट्या, जुलाब व मळमळ सुरू झाली.

राखाडीचं जेवण बाधलं... 22 जण थेट रुग्णालयात; विषबाधा झाल्याने शहापूरमध्ये खळबळ
| Updated on: May 29, 2026 | 3:47 PM

मुंबईत कलिंगड खाऊन एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. राज्यात विषारी अन्न खाल्ल्याने विषबाधा होण्याचे प्रकार घडत आहेत. कडाक्याचं ऊन असल्याने अन्न लवकर खराब होतं. त्यामुळे विषबाधा होत असल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना शिळं अन्न न खाण्याचं आवाहन करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूरमद्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. राखाडीचं जेवण खाल्ल्याने विषबाधा झाल्याने 22 लोकांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. या 22 जणांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

शहापुर तालुक्यातील किन्हवली जवळील शिळ गावामध्ये 22 जणांना अन्नातुन विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. शिळ गावामध्ये तीन दिवसांपूर्वी मयत झालेल्या व्यक्तीचा राखाडी कार्यक्रम होता.‌ त्या निमित्ताने जेवण ठेवण्यात आलं होतं. दुपारी हे जेवण बनवलं होतं. राखाडीच्या या कार्यक्रमाला बरेच पाहुणे आणि जवळचे लोक आले होते. या सर्वांना दुपारी हे जेवण देण्यात आलं होतं. जे लोक दुपारी जेवून गेले. त्यांना काहीच झाले नाही. त्यांची तब्येत ठणठणीत आहे.

थंड पाण्यात जेवण

बरीच पाहुणे मंडळी जेवून गेल्यावरही मोठ्या प्रमाणावर जेवण उरलं होतं. त्यामुळे उरलेलं अन्न उन्हामुळे खराब होऊ नये म्हणून थंड पाण्याच्या बादलीत ठेवण्यात आलं होतं. तसेच हे जेवण वाया जाऊ नये म्हणून संध्याकाळी जवळचे नातेवाईक, भावकीतील लोक आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांना बोलावून त्यांना हे जेवण खाऊ घालण्यात आलं. जेवताना अन्न खराब झाल्याची तक्रार कुणीच केली नाही. त्यामुळे अन्न खराब झाल्याचा कुणाला साधा संशयही आला नव्हता.

अचानक उलट्या सुरू…

जेवण होईपर्यंत कुणाला काहीच झालं नाही. जेवणानंतर थोडावेळ बसल्यावर अचानक कुणाला उलट्या तर कुणाला मळमळ व्हायला लागली. काहींना ताप आला तर काहींना जुलाब लागली. त्यामुळे एकच घबराट पसरली. एकूण 22 जणांना हे अन्न बाधलं. त्यामुळे या सर्वांना तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात रुग्णांची संख्या अधिक असल्याने काही रुग्णांना जमिनीवरच झोपवून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. आता या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगण्यात आलं आहे. जीवावरचं संकट दूर झाल्याने अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

रुग्णांची वणवण

दरम्यान, शहापूर उपजिल्हा रुग्णालया तीन महिन्यापासून बंद असल्याने येथील रुग्णांची मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. महिला किंवा पुरुष वार्डामध्ये स्वच्छतागृह गेले तीन महिन्यापासून बंद आहेत. त्यामुळे येथे रुग्णांची मोठी वणवण होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us