लोकशाहीर कॉ. अण्णाभाऊ साठे यांची कन्या शकुंतलाबाई यांचे निधन
शकुंतलाबाई या लोकशाहीर कॉम्रेड अण्णा भाऊ साठेंच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यक्तिगत कौटुंबिक जीवनाच्या अखेरच्या एकमेव साक्षीदार होत्या. त्यांच्या स्मृतीस, जनवादी लेखक संघ, प्रगतिशील लेखक संघ, लोक सांस्कृतिक मंच, विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि डाव्या, पुरोगामी चळवळीतर्फे त्यांना क्रांतिकारी अभिवादन अशी प्रतिक्रीया सुबोध मोरे यांनी दिली आहे.

लोकशाहीर कॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या द्वितीय कन्या शकुंतला अजित सपताल यांचे काल (२ ऑगस्ट २०२६ )पहाटे २.४५ वाजता प्रदीर्घ आजाराने वयाच्या ९२ व्या वर्षी नालासोपारा येथील रुग्णालयात दु:खद निधन झाले. त्यांना ब्रेनस्टोक झाल्यानंतर गेले काही दिवस त्यांच्यावर या रुग्णालयातच उपचार होत होते. त्या अलिकडे नालासोपारा येथे प्रशांत या त्यांच्या मुलाच्या घरी रहात होत्या. काल नालासोपारा येथे त्यांच्यापार्थिवावर जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितच अंत्यसंस्कार झाले.त्यांच्या पश्चात संजय , राजेश, प्रशांत ही मुले, मुलगी नंदिनी आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा विवाह इस्लामपूर येथील अजित सपताल यांच्यासोबत कॉ. अण्णाभाऊ साठे यांनीच लावून दिला होता.
शकुंतलाबाई या त्यांच्या बालपणापासून कम्युनिस्ट पक्षात सक्रीय होत्या. शंकुतलाबाई या जेष्ठ बहिण कॉ. शांताबाई, रोझा डांगे, कमल आणि सत्येंद्र मोरे, प्रभाकर मिरजकर, सुमन मोकाशी (संझगिरी) आदी सोबत बाल संघात आणि सांस्कृतिक कला पथकात सक्रिय होत्या. तसेच पक्षाच्या मुखपत्रांची विक्री करण्यात आपली आई कॉ.जयवंताबाई साठे यांच्या समवेत आघाडीवर आघाडीवर होत्या.
अण्णाभाऊंच्या प्रथम वाचक होत्या…
कॉम्रेड अण्णाभाऊ साठे चिराग नगरात भुमिगत असताना त्यांना पोलिसी ससेमिरा चुकवून कम्युनिस्ट पक्षाचे साहित्य,पत्रक त्या गुपचूप भेटून देत असत. कॉ. अण्णाभाऊ साठेंच्या अनेक कथा, कादंबऱ्याच्या त्या प्रथम वाचक होत्या. अण्णा भाऊंचे अक्षर समजायला अवघड असल्याने, त्यात त्या सुधारणा करीत असत. त्यांना स्वतः लाही लिखाणाची आणि साहित्याची आवड होती.
अण्णाभाऊ साठेंच्या आठवणींचे लेखन केले
कॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या निधनानंतर अण्णाभाऊंच्या अविस्मरणीय आठवणींचे लेखनही शकुंतलाबाई यांनी काही दिवाळी अंकात केले होते. त्यातील अण्णाभाऊ साठेंच्या गाजलेल्या ” फकिरा” कादंबरी लेखनासंदर्भातील आठवण तर खूपच ह्रदयद्रावक शब्दात त्यांनी लिहिली होती. त्यांना अण्णा भाऊ साठेंच्या साहित्याची आणि त्यांच्या राजकीय कार्याची चांगली जाण, समज होती. कॉ. अण्णाभाऊ साठे यांनी त्यांचे एक पुस्तकही शकुंतलाबाई आणि शांताबाई या मुलींना अर्पण केले आहे.
