बालबुद्धीने काही लोक… शरद पवार यांची पहिल्यांदाच अजितदादांवर खोचक टीका
माजी मंत्री शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. अजितदादा यांनी शरद पवार हे संभ्रम निर्माण करण्याचं काम करत आहेत, अशी टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना शरद पवार यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. त पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये त्यांचा गट विलीन करण्याचं सुतेवाच केलं होतं. पवारांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. शरद पवार असं बोलून संभ्रम निर्माण करत आहेत, असं अजितदादा म्हणाले होते. त्यावर शरद पवार यांनी अजितदादांना नाव न घेता खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. त्यावर मी काही बोलू शकत नाही. राजकारणात बालबुद्धी हे ज्यांचे वैशिष्ट्ये आहे असे अनेक लोक असतात. बालबुद्धीने काही लोक बोलत असतात. त्याकडे काय लक्ष द्यायचं? असा सवाल शरद पवार यांनी केला आहे.
शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. अजितदादांनी अशोक पवार यांच्यावरही टीका केली होती. तुम्ही आमदार कसे होता पाहतोच, असं अजित पवार म्हणाले होते. त्याबाबत शरद पवार यांना विचारण्यात आले. मी काही ते विधान ऐकलं नाही. पण मंत्री म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने काही पथ्य पाळायला हवीत. तुम्ही म्हणता तशी भाषा असेल तर ती त्या चौकटीत बसणारी नाही. लोक याबाबत निर्णय घेतील, असं शरद पवार म्हणाले.
देशाचं ऐक्य संकटात येईल
अमित शाह यांनी आरक्षणाबाबत विधान केलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. एससी, एसटीचं आरक्षण वाढवायचं असेल तर आमचा विरोध नाही. पण एखाद्या विशिष्ट समाजाबाबत राज्यकर्त्यांना अशी कशी भूमिका घेऊन चालेल? पंतप्रधान सर्वांचे असतात. देशाचे असतात. त्यांनी एका धर्माचा, जातीचा, भाषेचा विचार केला तर देशाचं ऐक्य संकटात येईल. मग पंतप्रधान असो की त्यांच्या मतदारसंघातील मंत्री असो. त्यांनी अशी भाष्य करता कामा नये, असंही पवार म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयात अपील करा
नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा आज निकाल लागला आहे. या प्रकरणात दोन जणांना जन्मठेप ठोठावण्यात आली आहे. तर तीन जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणाचा सूत्रधार सुटला आहे, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? असा सवाल पवार यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. हा न्यायदेवतेचा निकाल आहे. दाभोलकरांच्या आत्म्याला न्याय दिला. या प्रकरणातील मुख्यसूत्रधार सुटला असेल तर महाराष्ट्र सरकारने अपील करावं. सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडावी, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.