
जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करणे सोपे नाही. अनेक जणांना त्यात यश नाही. मग वयाच्या 50 व्या वर्षी एव्हरेस्ट सर करण्याचा विचार सामान्य हौशी गिर्यारोहक करु शकत नाही. परंतु अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील द्वारका विश्वनाथ डोखे यांनी धाडस केले आणि माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम केला. हा विक्रम करणाऱ्या त्या महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्याच महिला ठरल्या आहेत. ध्येय गाठण्याची प्रचंड इच्छाशक्ती असल्याने डोखे यांना शिखर सर करता आले.
मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात राहणाऱ्या द्वारका विश्वनाथ डोखे (वय 50) सध्या नाशिक येथे पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांच्या वाचनात “साद देती हिम शिखरे” हे पुस्तक आले. त्यानंतर त्यांना बर्फाच्छादित डोंगर सर करण्याचे आकर्षण वाटू लागले. त्यांनी अनेक छोटे डोंगर सर केले मात्र सर्वोच्च हिम शिखर असणारे माऊंट एव्हरेस्ट सर करण्याच्या ध्येयाने त्यांना पछाडले. मग त्यांनी त्यासाठी मेहनत केली. सराव केला. दोन वर्ष तयारी केल्यानंतर 30 मार्च 2024 ला माऊंट एव्हरेस्ट चढायला सुरुवात केली आणि 22 मे ला म्हणजेच साधारण 50 दिवसांच्या प्रयत्नात त्या माऊंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहचल्या.
द्वारका डोखे यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली.
सर्वोच्च शिखरावर पोहचात द्वारका त्यांनी भारताचा ध्वज हातात घेत राष्ट्रगीत म्हटले. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज फडकवत मानवंदना दिली. त्यानंतर दिवंगत आई वडिलांचा फोटो झळकवत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. हा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात भावूक असणारा क्षण होता, अशी प्रतिक्रिया द्वारका डोखे यांनी दिली.
एमपीएससी केल्यानंतर 2006 साली द्वारका महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाल्या होत्या. द्वारका अविवाहित असल्या तरी त्यांना नोकरी सोबत त्यांचे ध्येय गाठण्यासाठी कुटुंबियांची साथ मिळाली. वरिष्ठांकडून नेहमी प्रोत्साहन मिळाले. यामुळे त्या एव्हढ्या मोठ्या विक्रमला गवसणी घालू शकल्या. श्रीरामपूर शहरात त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.