भगव्याला दैवत मानलं, भगव्यालाच कवटाळून गळफास, उस्मानाबादेत कट्टर शिवनसैनिकाची आत्महत्या! काय घडलं??

| Updated on: Jan 04, 2022 | 3:50 PM

उस्मानाबादेत 65 वर्षांच्या शिवसैनिकाने आज आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. शिवसेनेची पहिली शाखा उस्मानाबादेत स्थापन करणाऱ्या या शिवसैनिकाने आर्थिक विवंचनेतून गळफास घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

भगव्याला दैवत मानलं, भगव्यालाच कवटाळून गळफास, उस्मानाबादेत कट्टर शिवनसैनिकाची आत्महत्या! काय घडलं??
शिवसैनिक दत्तात्रय वऱ्हाडे यांची आत्महत्या
Follow us on

उस्मानाबादः जिल्ह्यात शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या शिवसैनिकानेच आत्महत्या केल्याने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. दत्तात्रय नारायण वऱ्हाडे असं या 65 वर्षीय शिवसैनिकाचे नाव आहे. वऱ्हाडे यांनी 1984 साली उस्मानाबाद शहरात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन केली होती. अत्यंत सामान्य राहणी, तंगीची आर्थिक परिस्थिती असतानाही मैलोन् मैल पायी आणि सायकलवर स्वारी करत त्यांनी शिवसेनेचा प्रचार केला. काही दिवसांपूर्वीच दत्तात्रय हे अत्यंत हलाखीत जीवन जगत असल्याचे वृत्त माध्यमांतून झळकले होते. मात्र आज पहाटे 4 जानेवारी रोजी त्यांनी शिवसेनेच्या भगव्यानंच गळफास घेतल्याची दुर्दैवी घटना समोर आली. उस्मानाबादेतील त्यांच्या घराशेजारील झाडाला भगव्याच्या सहाय्यानेच त्यांनी गळफास घेतला.

उस्मानाबादमध्ये पहिली शिवसेनेची शाखा स्थापणारा सैनिक

कोणतीही निवडणूक असली तरी शिवसेनेच्या प्रचारासाठी कायम पायाला भिंगरी लावून फिरणारे कट्टर शिवसैनिक अशी दत्तात्रय यांची प्रतिमा होती. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे तर त्यांच्यासाठी दैवतच होते. बाळासाहेब ठाकरे यांचा निस्सीम भक्त अशीच त्यांची परिसरात ओळख होती. 1984 साली जिल्ह्यातील पहिली शिवसेनेची शाखा त्यांनी उस्मानाबाद शहरात स्थापन केली. ही शाखा स्थापन करतानाही, त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यावेळीदेखील उधार पैसे घेऊन त्यांनी शिवसेनेची शाखा स्थापन केली होती.

आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

दत्तात्रय वऱ्हाडे हे चपाच्या टपरीवरच उदरनिर्वाह करायचे. पण ज्यावेळी निवडणुका असतील तेव्हा ते टपरी बंद करून प्रचारकार्यात लागायचे. वऱ्हाडे यांना 4 मुली आणि 2 मुले आहेत. मुलींची लग्न झाली. मुलांनी अर्धवट शिक्षण सोडून कामधंदा सुरु केला. कुटुंबाची वाताहत होत असताना फक्त शिवसेनेवर श्रद्धा ठेवून भगव्यासाठीच आयुष्य वेचलेल्या या शिवसैनिकाने अशा प्रकारे आत्महत्या केल्याने राजकीय हळहळ व्यक्त होत आहे. त्यांनीच स्थापन केलेल्या उस्मानाबादेतील शिवसेनेतून अनेक कार्यकर्ते मोठे झाले, आमदार, खासदार झाले, पण या शिवसैनिकाची यामुळे थोडीही भरभराट झाली नाही, अशी खंत व्यक्त केली जात आहे.

इतर बातम्या-

Nashik| लासलगावसह 16 गावांचा पाणीप्रश्न मार्गी; भुजबळांच्या प्रयत्नातून 17 कोटी 54 लाखांचा निधी मंजूर

कोण आहेत प्रदीप कंद ज्यांच्या विजयानं अजित पवारांना ‘वाईट’ वाटलं?; भाजपनं पुणे बँक निवडणुकीत खातं कसं उघडलं?