‘नारायण राणेंकडून माझ्या जीवाला धोका’, आमदार वैभव नाईक यांचं एसपींना पत्र, केली मोठी मागणी

"भाजप खासदार नारायण राणे यांच्यापासून मला आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या जीवितास धोका आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा", अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. वैभव नाईक यांनी याबाबतचं निवेदन एसपींना दिलं आहे.

नारायण राणेंकडून माझ्या जीवाला धोका, आमदार वैभव नाईक यांचं एसपींना पत्र, केली मोठी मागणी
नारायण राणे आणि वैभव नाईक
| Edited By: Chetan Patil | Updated on: Aug 29, 2024 | 4:00 PM

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर झालेल्या राडा प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी खासदार नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिलं आहे. “राजकोट येथे महायुतीच्या युवासेना प्रमुखांसह राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते हे महाराजांचा पुतळा पडल्यानंतर आमदार वैभव नाईक यांच्यासह पाहणीसाठी राजकोट येथे गेले होते. यादरम्यान त्या ठिकाणी उपस्थित असणारे भाजप खासदार नारायण राणे यांनी गोंधळ घालत माझ्यासह माझ्या सहकाऱ्याना पोलिसांसमोरच एकेकाला रात्रभर घरातून खेचून मारून टाकीन अशी धमकी दिली. याआधी सुद्धा माझे काका कैलासवासी श्रीधर नाईक यांची राजकीय वैमनस्यातून हत्या झाली आहे. सदरच्या गुन्ह्यात नारायण राणे हे तेरावे आरोपी होते. तरी त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा”, अशी मागणी ठाकरे शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.

वैभव नाईक नेमकं काय म्हणाले?

“मी, वैभव विजय नाईक वय ४८ रा. बिजलीनगर कणकवली, काल गुरुवार दि. २८/०८/२०२४ रोजी मालवण येथील राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी गेलो असताना त्या ठिकाणी उपस्थित असलेले खासदार नारायण राणे यांनी गोंधळ घालत आपल्या व आपल्या सहकारी पोलिसांसमोरच, नारायण राणे यांनी मला व माझ्या सहकार्याना “एकेकाला रात्रभर घरातून खेचून मारून टाकेन अशी धमकी दिली. या आधी सुद्धा माझे काका के. श्रीधर नाईक यांची राजकीय वैमनस्यातून हत्या झाली आहे. तेव्हा नारायण राणे हे तेरावे आरोपी होते, तरी त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, ही मागणी”, असं वैभव नाईक निवेदनात म्हणाले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

सिंधुदुर्गच्या मालवण येथे असणाऱ्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. पण त्यानंतर अवघ्या आठ महिन्यातच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या घटनेनंतर आमदार आदित्य ठाकरे, विधीमंडळाचे दोन्ही विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे राजकोट किल्ल्यावर गेले होते. त्याचवेळी भाजप खासदार नारायण राणे आणि त्यांचे चिरंजीव निलेश राणे तिथेच उपस्थित होते.

यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि राणे समर्थक समारोसमोर आले. मोठा राडा झाला. यावेळी नारायण राणे यांनी केलेल्या एका वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विरोधकांकडून या व्हिडीओवरुन नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला जातोय. नारायण राणे यांच्या त्याच वक्तव्यावरुन वैभव नाईक यांनी पोलिसांना गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन दिलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us