Rahul Narvekar : आमदार अपात्रतेच्या मुद्यावरील माझा निर्णय सुप्रीम कोर्टात टिकून राहील, राहुल नार्वेकरांनी सांगितलं त्यामागचं कारण…VIDEO
Rahul Narvekar : शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणाचं? हा खटला सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. नियमित सुनावणीमध्ये काल ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल यांनी आमदार अपात्रतेचा मुद्दा मांडला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर त्यांनी खापर फोडलं. त्यानंतर या मुद्यावर आता राहुल नार्वेकर बोलले आहेत.

शिवसेना कोणाची? पक्ष आणि निवडणूक चिन्हावरुन सध्या सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी सुरु आहे. उद्धव ठाकरे गटाकडून युक्तीवाद करणारे ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल यांनी आमदार अपात्रतेच्या मुद्यावर युक्तीवाद केला. विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेचा निर्णय घेतला नाही असं म्हणत सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्षांवर खापर फोडलं. पक्षाने आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली होती. पण आमच्या प्रकरणात अध्यक्षांनी निर्णय प्रलंबित ठेवल्याचं सिब्बल यांनी कोर्टात सांगितलं. 2023 मध्ये अध्यक्षांनी आमदारांना नोटीस दिल्याचेही कोर्टात सांगण्यात आलं. या नोटीसला शिंदेंच्या आमदारांनी उत्तर दिलं.
आता या मुद्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बोलले आहेत. “पिठासीन अधिकारी म्हणून अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेण्याची माझी संवैधानिक जबाबदारी आहे. कायद्याच्या सगळ्या तरतुदीचं पालन केलय. डिस कॉलिफिकेशन ऑफ मेंबर ऑन ग्राउंड रुल 1986, त्याचप्रमाणे 10th शेड्युलमध्ये जे प्रोविजन आहेत, त्या सगळ्याचं पालन केलय. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे आम्ही त्या निकषात बसून योग्य निर्णय घेतलेला आहे. पूर्णपणे खात्री आहे हा निर्णय अत्यंत शाश्वत असल्याने हा निश्चितपणे कोर्टात टिकून राहील” असं राहुल नार्वेकर म्हणाले.
तो सन्मानाने स्वीकारणे हे अत्यंत आवश्यक
“सध्या हे सगळं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मी केलेलं काम चोख असल्याने कुठेही चूक मिळणार नाही अशी मी मनापासून इच्छा व्यक्त करतो. सुप्रीम कोर्ट अंतिम आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेला जो काही निर्णय असेल तो सन्मानाने स्वीकारणे हे अत्यंत आवश्यक आहे. सुप्रीम कोर्टातही याचिका असल्याने यावरती अधिक भाष्य करणे योग्य होणार नाही” असं राहुल नार्वेकर म्हणाले.
आपण फिरून कोणावर उपकार करत नाहीय
आदित्य ठाकरेंसंदर्भातील प्रश्नावर ते म्हणाले की, “नेत्यांचं काम आहे लोकांसाठी फिरणं. आपण फिरून कोणावर उपकार करत नाहीय. मी देखील या ठिकाणी बारा वाजता आलेलो आहे. माझी जबाबदारी आहे या ठिकाणच्या नागरिकांना योग्य पाणी देणं, त्यांचा हक्क देणं. कुठले लोक प्रतिनिधी फिरत असतील तर ते लोकांवर उपकार करत नाहीत ते त्यांचं काम आहे ते त्यांनी केलेच पाहिजे”
पाण्याची नेहमी टंचाई असते
कुलाबा परिसरात पाणी टंचाईची समस्या आहे, स्वत: तिथे जाऊन राहुल नार्वेकर यांनी पाहणी केली. “कुलाबा परिसर हा लो लाईन एरिया आहे. मलबार हिल वरून शेवटचे टोक कुलाबा नेवी नगर वाढत असताना या ठिकाणी पाण्याची नेहमी टंचाई असते. या ठिकाणी बीएमसी कडून पाण्याचा पुरवठा होत नाही म्हणून मी माझ्या आमदारनिधीतून तिथे दोन लाख लिटर पाण्याची टाकी बांधून दिली. परंतु महानगरपालिकेकडून या ठिकाणी पाणी पुरवठा होत नाही आणि नागरिकांना पाणी मिळत नाही” असं राहुल नार्वेकर बोलले.
