आताच्या आता कर्जमुक्ती करा, तातडीने… उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर, सरकारला मोठा इशारा

उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर असून, त्यांनी नांदर गावात शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत, त्यांना मिळालेल्या सरकारी मदतीचा आढावा घेतला.

आताच्या आता कर्जमुक्ती करा, तातडीने... उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर, सरकारला मोठा इशारा
uddhav thackery
| Updated on: Nov 05, 2025 | 10:48 AM

उद्धव ठाकरे आजपासून चार दिवस मराठवाडा दौर्‍यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पैठण तालुक्यातील नांदर गावात शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून नुकसानीचा आणि सरकारी मदतीचा आढावा घेतला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नांदर गावात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा ऐकल्या. तसेच राज्य सरकारने जाहीर केलेली अतिवृष्टी नुकसानीची भरपाई (भरपाई) प्रत्यक्षात किती मिळाली, मिळाली की नाही, याची माहिती त्यांनी शेतकऱ्यांकडून घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारकडे एक मोठी मागणी केली आहे.

मराठवाड्यावर गेल्या वर्षभरात आपत्तीवर आपत्ती

मी कोणताही राजकीय प्रचार करायला आलो नाही. तुम्ही सर्व कंटाळला आहात. दरवेळी निवडणुका आल्यावर आम्ही राजकीय नेते येतो. तुमच्या कोपराला गुळ लावून जातो. तुम्ही भोळेभाबडे आहेत. स्वप्न दाखवलं की बळी पडता आणि आपलं आयुष्य देऊन टाकता. मराठवाड्यावर गेल्या वर्षभरात आपत्तीवर आपत्ती येत आहे. पाऊस थांबायचं नाव घेत नाही. कधी नव्हे ते एवढं मोठं संकट मराठवाड्याने अनुभवलं आहे. ज्येष्ठ शेतकऱ्यांनी सांगितलं असा पाऊस पाहिला नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मी तेव्हाही आलो होतो. माझ्या दौऱ्याची टिंगल केली. मी शेतकऱ्यांशीच बोललो. तुमची मागणी मांडली. एक तर हेक्टरी ५० हजार मिळाले पाहिजे ही मागणी बरोबर की चूक तुम्हीच सांगा. थकीत कर्ज फेडणार कसं. हातातील पिक गेलं. खरीप गेलं. रब्बी कसं घेणार जमीन खरडून गेलं आहे, असे अनेक सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केले.

परत मुख्यमंत्र्यांनी गुळ लावला

दयावान सरकारचा अभ्यास सुरू आहे. मी माझं मोठेपण सांगत नाही. मुख्यमंत्री असताना कर्तव्य केलं. अनपेक्षितपणे मुख्यमंत्री झालो. मी कर्तव्य म्हणून केलं. समिती नेमली नाही. मी कर्जमुक्ती केली. हे अभ्यास करत आहेत. सर्व शेतकऱ्यांची सर्कल निहाय माहिती सरकारकडे आहे. महात्मा फुलेंच्या नावाने कर्जमुक्ती योजना राबवली. त्याची माहिती सरकारकडे आहे. परदेशी समिती नेमली. परदेशी समिती येणार आणि स्वदेशी समिती नेमली. गेल्या आठवड्यात काही तरी होईल वाटलं होतं. सर्व एकजूट झाले होते. परत मुख्यमंत्र्यांनी गुळ लावला, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

कर्जमुक्ती करा

कर्जमाफी करण्या आधी माती तर द्या. मग कर्ज द्या. मी हा विषय सोडणार नाही. तुम्हाला न्याय मिळेपर्यंत तुमच्यासोबत राहणार. केंद्रीय पथक फिरतंय. दिवाळीच्या आत पैसे देणार होते. दिवाळी झाली. तुळशीचं लग्न झालंय. पंचांग काढत आहेत. मुहूर्तमागे मुहूर्त काढत आहेत. पण मदतीच्या नावाने बोंबाबोंब.  आम्ही तुमच्यासोबत राहणार आहोत. आम्हाला जूनची मुदत मान्य नाही. कर्जमुक्ती करा. आताच्या आता कर्जमुक्ती करा, तातडीने हेक्टरी ५० हजार रुपये द्या, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.