फोटोसेशन करण्यासाठी उद्धव ठाकरे इर्शाळवाडीत!; कुणी केली टीका?

| Updated on: Jul 22, 2023 | 4:23 PM

Nitesh Rane on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांची दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडीला भेट, भाजप नेत्याचं टीकास्त्र; म्हणाले, उद्धव ठाकरे फोटोसेशन करण्यासाठी इर्शाळवाडीत...

फोटोसेशन करण्यासाठी उद्धव ठाकरे इर्शाळवाडीत!; कुणी केली टीका?
Follow us on

सिंधुदुर्ग | 22 जुलै 2023 : रायगडमधल्या इर्शाळवाडी गावात दोन दिवसा आधी दरड कोसळल्याची घटना घटली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडी गावााला आज भेट दिली. उद्धव ठाकरे यांनी स्थानिकांची विचारपूस केली. घाबरू नका. आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी इर्शाळवाडीवासीयांना धीर दिला. त्यावर भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे.

तुम्ही मुख्यमंत्री असताना काय मदत केली, याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावं. ते फोटोसेशन करण्यासाठी दुर्घटनाग्रस्त भागात जात असतील. त्याचा काही उपयोग नाही. चित्रपट संपायला आला आणि हे पोहोचले आहेत. विनायक राऊत हे कोकण निर्मित संकट आहे. मतदारांना विनंती आहे की, 2024 मध्ये हे संकट दूर करावं, असा घणाघात नितेश राणे यांनी केला आहे.

आजच्या सामनाच्या अग्रलेखातून मणिपूरच्या हिंसाचारावर भाष्य करण्यात आलं आहे. ‘मणिपूर फाईल्स’ या शीर्षकाखाली आजचा हा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यावरही नितेश राणे यांनी टीका केली आहे.

विनाशकाले विपरीत बुद्धीप्रमाणे आजचा सामनाचा अग्रलेख आहे. मणिपूर घटनेतील राक्षसांना कठोर शिक्षा मिळणार आणि त्याची कारवाई सुरु झाली झाली आहे. मणिपूर घटनेवर बोलणारे विरोधी लोक जोधपूर घटनेवर बोलतील का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोध करण्यासाठी ते बोलत आहेत, असं म्हणत नितेश राणे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय.

या देशाला विकसित कोण करू शकतो, रक्षण कोण करू शकतो, हे भारतातील महिलांना माहीती आहे. काँग्रेसच्या महिला आमदारांनी देशातील इतर घटनांवर पण बोलावं. चित्रपटातील शक्ती कपूर म्हणजे संजय राऊत! मणिपूर फाईल्सवर बोलणार्यांनी रशियन फाईल्सबाबत देखील माहिती द्यावी. फक्त मोदी द्वेष आणि भाजप द्वेष करत असल्यामुळे हे असं बोललं जात आहे. तुमचे राहुल गांधी बोलण्याची हिंमत दाखवतील का? वेळ आणि तारीख सांगा आम्ही तुम्हाला सिनेमे दाखवतो, असं आव्हान नितेश राणे यांनी संजय राऊतांना दिलं आहे.

राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील, असं म्हटलं आहे. त्यावर आमचे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत ही आमची भावना आहे. तशीच मिटकरी यांनी आपली भावना व्यक्त केली. 2024 पर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील, असं म्हणत नितेश राणे यांनी अमोल मिटकरी यांच्या ट्विटला उत्तर दिलं आहे.