मोठी बातमी ! मनोज जरांगे हेच आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा; कुणी केली ही घोषणा?

ज्या नेत्यांनी कधी आमचा आवाज उचलला नाही, त्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून आम्ही कसं बसू शकतो.आमचा खरा प्रतिनिधी, आमचा खरा आवाज आज उरलेला नाही असेही या नेत्याने म्हटले आहे.

मोठी बातमी ! मनोज जरांगे हेच आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा; कुणी केली ही घोषणा?
मनोज जरांगे पाटील
| Updated on: Oct 01, 2024 | 7:23 PM

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट समाजातील विविध नेते घेत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चुलत पणतू राजरत्न आंबेडकर यांनी देखील मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर हिंगोलीत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रीया दिली आहे. ते यावेळी म्हणाले की मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी प्राण पणास लावले आहे. मराठा आरक्षणाकरिता लढा उभा केला आहे, त्याला पूर्ण पाठिंबा असल्याने मराठा समाजाने आम्हाला आमंत्रित केल आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या पक्षांपासून आम्ही दूर आहोत. मनोज जरांगे यांचा पक्ष नसल्याने आम्ही त्यांना भेटायला आलो आहोत असेही राजरत्न आंबेडकर यांनी म्हटले आहे.

राजरत्न आंबेडकर पुढे म्हणाले की आम्ही राजकीय पक्षांपासून दूर आहोत. आमचा खरा प्रतिनिधी आज उरलेला नाही. अनुसूचित जातीच्या 29 जागा आरक्षित असताना त्यापैकी 15 जागा तर बीजेपीने चोरलेल्या आहेत. जो पक्ष घटना संविधान हटविणार असे सांगत असतो तोच पंकजा मुंडे यांना आरक्षित जागेवर उभे करुन निवडून आणतो.बीजेपी संविधान संपविण्याची भाषा करते त्यांना आरक्षित जागेवर उमेदवार उभा करण्याचा नैतिक अधिकार आहे का ? असा सवालही राजरत्न आंबेडकर यांनी केला आहे. मराठा, मुस्लिम ,बौद्ध ,लिंगायत, मातंग, माळी या समाजाला एकत्र आणायला हवे, महाविकास आघाडी आणि महायुती हे पक्षीय राजकारण आहे, ते थांबलं पाहिजे आणि खरे प्रतिनिधी आपण सभागृहात पाठवले पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

उद्यापासून विदर्भात जाणार

आमच्या कोणत्याही पक्षासोबत बैठका सुरू नाही तर समाजासोबत बैठका सुरू आहेत. ज्यांच्यासोबत बैठका सुरू आहेत त्यांचा कोणताही राजकीय पक्ष नाही. मनोज दादांचा पक्ष नाही, माझा पक्ष नाही, अण्णाभाऊ साठेचे नातू आहेत, त्यांचाही पक्ष नाही त्यांच्यासोबत बैठका सुरू आहेत. मराठवाड्यानंतर उद्यापासून विदर्भात जातो आहोत असेही राजरत्न यांनी सांगितले. राजरत्न हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चुलत पणतू आहेत. ते सध्या भारतीय बौद्ध महासभा या संघटनेचे अध्यक्ष आहेत.

राजकारणात नैतिकता राहीली नाही

सिद्धार्थ मोकळे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यासंदर्भात विचारले असता राजरत्न म्हणाले की राजकारणात नैतिकता राहीलेली नाही. जे इतकी वर्षे एका पार्टीत राहीले ते रात्रीचे उठून दुसऱ्या पार्टीत जातात. उद्या तेही भाजपात गेले तर कोणलाही मोठा धक्का वगैरे बसणार नाही.अल्पसंख्यांक मंत्री किरण रिजिजू दौरा करीत आहेत. आमच्याही आंबेडकर फॅमिली मधल्या एक दोन सदस्य त्यांच्या गळाला लावण्यासाठी प्रयत्न करीत होते, त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे, एकही बौद्ध बीजेपीला कधीही फेव्हर करणार नाही, त्यांच्याकडे आकर्षित होणार नाही असेही ते म्हणाले.

तर मुख्यमंत्र्याचा चेहरा जरांगे ?

दसरा मेळाव्याला मनोज दादा त्यांचा निर्णय घेणार आहेत.त्याचवेळी आम्ही विजयादशमी साजरी करत असतो आणि तेव्हा या विजयाचा संपूर्ण प्लॅन आम्ही महाराष्ट्र समोर ठेवणार आहोत. मराठा, मुस्लिम, धनगर, लिंगायत, माळी, मातंग, बौद्ध हे लोक आमच्यासोबत असतील. जरांगे यांच्या अपोझिट काऊंटर आंदोलन उभे करण्याचे काम सागर बंगल्याच्या माध्यमातून होत असतं. काल-परवा आपल्याच टीव्हीच्या माध्यमातून दिसलं हे कशा पद्धतीने यांचे चरित्र आहे, भांडण लावण्याचे जे काम सुरु आहे. मराठा आणि ओबीसी यांचे भांडण लागलं पाहिजे. मराठा आणि ओबीसी जागृत झाला आहे, कुठेही तशा दंगली झाल्या नाहीत. त्यानंतर त्यांनी मराठा आणि बौद्ध यांच्यात दंगली होतात का याचीही चाचपणी केली, परंतु तसे काही झालं नाही असेही राजरत्न म्हणाले. विधानसभेमध्ये आमचे उमेदवार गेले तर ते मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरतील. आम्हाला हवा त्या पद्धतीने आम्ही रिझल्ट दिला तर आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा मनोज जरांगे असतील असेही शेवटी राजरत्न आंबेडकर यांनी सांगितले.

Follow Us