परिवहन मंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद, एसटीच्या 215 आगारातून वाहतूक सुरु

अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू होण्याचे आवाहन केले होते. या आवाहनामुळे आशादायक चित्र निर्माण झाले असून रोज 300 ते 400 कर्मचारी कामावर रूजू होत आहेत.

परिवहन मंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद, एसटीच्या 215 आगारातून वाहतूक सुरु
अनिल परब
| Edited By: | Updated on: Jan 14, 2022 | 8:12 PM

मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब (Anil parab) यांनी कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू होण्याच्या केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या आवाहनामुळे दिवसेंदिवस कर्मचारी (St worker) कामावर रूजू होण्याच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत 26 हजार 500 पर्यंत कामगार रूजू झाले असून गुरुवारी 215 आगारांतून 2382 बसेस रस्त्यावर धावल्या. सुमारे 7138 फेऱ्यांमधून सुमारे 4 लाख प्रवाशांनी प्रवास केला, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकिय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. दरम्यान, संपाच्या पार्श्वभूमिवर प्रवाशांना वाहतूकीची सेवा उपलब्ध व्हावी यासाठी एसटीचे सेवानिवृत्त व कंत्राटीपद्धतीवर चालक नेमण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकिय संचालक शेखर चन्ने यांनी आज वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

रोज 300 ते 400 कर्मचारी कामावर रूजू

गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ एसटीचा संप सुरु आहे. संपामुळे एसटीची वाहतूक बंद असल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमिवर सोमवार सह्याद्री अतिथिगृह येथून पत्रकारांशी संवाद साधताना परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू होण्याचे आवाहन केले होते. या आवाहनामुळे आशादायक चित्र निर्माण झाले असून रोज 300 ते 400 कर्मचारी कामावर रूजू होत आहेत. कामगारांमधील सकारात्मक बदलामुळे कामावर रूजू होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राज्यभरातील 250 आगांरापैकी 215 आगारांतून वाहतूक सुरु झाली आहे. कामावर रूजू होण्याबाबत कामगारांकडून विचारणा केली जात असून, कर्तव्यावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना संरक्षण दिले जात असल्याचेही चन्ने यांनी सांगितले.

संपामुळे 1200 कोटींचा तोटा

संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना अनिल परब तसेच एसटी महामंडळ प्रशासनाकडून कामावर हजर राहण्यासाठी वारंवार आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला न जुमानता संपात सहभागी झालेल्यांवर कारवाई सुरु असल्याचेही श्री.चन्ने यांनी सांगितले. आतापर्यंत दोन हजारांहून अधिक रोजंदारीवरील कामगारांची सेवासमाप्ती करण्यात आली असून 3123 कर्मचारी बडतर्फ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान संपामुळे एसटी महामंडळाला सुमारे 1200 कोटीचा तोटा झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

संपामुळे सर्वसामान्यांची गैरसोय होऊ नये आणि त्यांना वाहतूकीची सेवा उपलब्ध व्हावी यासाठी महामंडळाने सेवानिवृत्त तसेच कंत्राटी पद्धतीवर चालकांची नियुक्ती केली असल्याचे श्री. चन्ने यांनी सांगितले. पुणे, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, धुळे, जळगाव, नागपूर आणि भंडारा येथील आगारांतू मिळून 400 कंत्राटी चालक नेमण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत सेवानिवृत्त 402 चालकांचे अर्ज आले असून त्यापैकी ९१ चालक पात्र ठरले असल्याची माहिती श्री. चन्ने यांनी दिली. दरम्यान, जास्तीत जास्त नागरीकांना पूर्वीप्रमाणे वाहतूकीची सेवा उपलब्ध व्हावी यासाठी सर्व कामगारांनी कर्तव्यावर रुजू व्हावे, असे आवाहन करतानाच प्रत्येक गोष्टीला मार्ग आहे. रूजू झाल्यानंतर चर्चेतून मार्ग काढला जाईल, अशी ग्वाही श्री.चन्ने यांनी दिली.

अजितदादांवर विश्वास नसेल तर आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपद सोपवा, भाजपाच्या आमदाराची मागणी!

VIDEO: पंतप्रधानांसोबतच्या बैठकीला दांडी, पालिकेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

Nashik ZP| झेडपी निवडणूक लांबणीवर पडणार; पण मुदतवाढ न मिळता प्रशासक येण्याचे संकेत, कारण काय?

Follow Us